राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेसाठी विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा, टिंगरेही अर्ज दाखल करणार
माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Vikram Kakade declared as candidate for Legislative Council : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्षातूनच त्यांच्या नावाला विरोध होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यातच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षातील पहिला राजीनामा समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील जिजाई बंगल्यावर माजी खासदार आणि भाजपचे नेते संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. त्यानंतर लगेचच विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला विरोध दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागाईची आग भडकली! इंधन दरवाढीनंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांवर अप्रत्यक्ष भार
दरम्यान, पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गाडे यांनी आपला राजीनामा पक्षाचे नेते सुनील टिंगरे यांच्याकडे सोपवला आहे. उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच पक्षातील पहिला राजीनामा समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता पक्ष नाराज कार्यकर्त्यांची समजूत कशी काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाकडून विक्रम काकडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांना देखील पक्षाने एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर येत असून ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. विक्रम काकडे यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद उफाळून येत असल्याचे चित्र आहे. पक्ष नेतृत्व यावर कसा तोडगा काढते आणि आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.