बीडचा बिहार! दहा महिन्यांत 36 अन् पाच वर्षांत 276 हत्या; मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

CM Devendra Fadnavis on Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड (Santosh Deshmukh Murder Case) जिल्ह्याची देशभरात चर्चा सुरू झाली. याच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कशी फोफावली आहे याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच (Devendra Fadnavis) सभागृहात मांडली. बीड जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या काळात तब्बल 36 खून झाले आहेत. तसेच मागील पाच वर्षांत 276 हत्या आणि 766 हत्येचे प्रयत्न झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातील या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची माहिती देताना यावर काय उपाययोजना करण्यात येत आहेत. याचीही माहिती त्यांनी दिली. बीड जिल्ह्यात 260 जणांकडे शस्त्र परवाने आहेत. यातील 99 परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मागील काही वर्षात जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता असे दिसून आले की अनेक गुन्हेगारांकडे अधिकृत शस्त्र परवाने आहेत. त्यामुळे यातील 99 परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील शस्त्र साठ्यावरही सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार
दरम्यान, बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या घटना घडू नयेत त्यांना वेळीच आळा बसावा यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडूनही बीड जिल्ह्यातील घडामोडींचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. अजित पवार यांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकत्व घेतलं आहे. त्यामुळे सर्वांचेच सध्या बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत झाले आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण राज्यभरात गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले होते. अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे या फोटोतून दिसत होते. फोटो पाहून राज्यभरात पुन्हा संतापाची लाट उसळली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव होता. अखेर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी वैद्यकीय कारणांचा हवाला देत मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
राजीनामा देतानाही धनंजय मुंडेंनी मग्रुरी दाखवली : मनोज जरांगेंचा घणाघात