पालिकेची भूमिका संशयास्पद, उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा; आशिष शेलार यांचे निर्देश

पालिकेची भूमिका संशयास्पद, उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा; आशिष शेलार यांचे निर्देश

Ashish Shelar On BMC :  गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत (BMC) वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आज आढावा बैठक मंत्रालयात मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले.

एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे.

प्रकाश आंबेडकरांना धक्का, 76 लाख वाढीव मतदान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube