आयटी कंपन्यांना इशारा! २०३० पर्यंत बीपीओसारख्या नोकऱ्या गायब होतील, काय म्हणाले खोसला?
खोसला यांनी स्पष्ट केलं की, केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणं हा भारतासारख्या देशात सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचा एकमेव मार्ग नाही.
भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि उद्यम भांडवलदार विनोद खोसला (A I) यांनी एक मोठं भाकीत केलं आहे. ते म्हणाले, २०५० पर्यंत लोकांना नोकऱ्यांची गरज भासणार नाही, कारण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने वाढत आहे.
२०३० पर्यंत आयटी आणि बीपीओ धोक्यात?
खोसला असा दावा करतात की २०३० पर्यंत आयटी सेवा आणि बीपीओ उद्योग त्यांच्या सध्याच्या स्वरूपात जवळजवळ नाहीसे होऊ शकतात. एआय-आधारित ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानामुळे पारंपारिक आउटसोर्सिंग मॉडेल टिकाऊ राहणार नाही. तांत्रिक परिवर्तन वेगाने होत असले तरी लोक या बदलाची गती गांभीर्याने घेत नाहीत असंही ते म्हणाले आहेत.
Explained : टॅरिफवर ट्रम्प यांचा ‘यू-टर्न’! पाच मोठी कारणं ज्यामुळे अमेरिकेची भूमिका बदलली
त्यांनी असंही म्हटलं की, अनेक व्हाईट कॉलर नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होईल. व्यावसायिकांना, विशेषतः जे १५-२० वर्षांपासून एकाच पद्धतीने काम करत आहेत आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास मंद आहेत, त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात. जर त्यांनी स्वतःला काळासोबत अपडेट केलं नाही, तर तंत्रज्ञान उद्योगात त्यांची मागणी कमी होऊ शकते असंही ते म्हणाले. त्याचबरोबर एआयला घाबरण्याऐवजी, ते स्वीकारणे आणि नवीन कौशल्ये शिकणे महत्वाचं आहे, कारण भविष्य पूर्णपणे तंत्रज्ञान-चालित असणार आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आरोग्य क्षेत्रातही एआयच्या वापरावर भर
शिवाय, त्यांनी आरोग्यसेवा क्षेत्रात एआयच्या वापरावर भर दिला. खोसला यांनी स्पष्ट केलं की, केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणं हा भारतासारख्या देशात सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचा एकमेव मार्ग नाही. त्यांचा असा युक्तिवाद आहे की भरपूर पैसा आणि वेळ असूनही, भारतातील डॉक्टर-रुग्ण गुणोत्तर अमेरिकेइतके मिळवणं कठीण होईल. एआय डॉक्टर हा एक व्यावहारिक उपाय असू शकतो. त्यांच्या मते, जर ७०० दशलक्ष लोकांना दररोज प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्याची आवश्यकता असेल, तर एआय हे काम तुलनेने कमी खर्चात पूर्ण करू शकते, जे देशाच्या एकूण आरोग्यसेवा बजेटचा एक छोटासा भाग आहे असंही ते म्हणाले.
