दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! CBSE ने थ्री-लँग्वेज पॉलिसीबाबत बदलला निर्णय

Three-Language Rule नवीन त्रि-भाषा सूत्र इयत्ता ७ वी, ८ वी, ९ वी आणि सध्याच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही.

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 06 29T155442.050

CBSE Relaxes Three-Language Rule for Current Class 10 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) थ्री-लँग्वेज पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्याच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. इतकेच नव्हे, तर सध्या सातवी, आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही भविष्यात दहावीत तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. CBSE च्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दहावीच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना थेट सूट (सत्र 2026-27)

या बॅचसाठी कोणताही बदल नाही. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच फक्त दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. त्यांना तिसरी भाषा घेण्याची गरज नाही.

इयत्ता 9 (सत्र 2026-27) 

– विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे अनिवार्य आहे.

– जर एखादा विद्यार्थी आधीच हिंदी आणि तमिळ अशा दोन भारतीय भाषा शिकत असेल, तर तो तिसरी भाषा म्हणून आणखी एक भारतीय भाषा किंवा इंग्रजी, फ्रेंच यांसारखी विदेशी भाषा निवडू शकतो.

– जर एखादा विद्यार्थी तमिळ आणि इंग्रजी शिकत असेल, तर त्याला तिसरी भाषा म्हणून एक भारतीय भाषा जोडावी लागेल.

– जर एखादा विद्यार्थी इंग्रजी आणि फ्रेंच अशा दोन विदेशी भाषा शिकत असेल, तर त्याला ‘वन-टाइम विशेष सवलत’ देण्यात आली आहे. तो दोन्ही विदेशी भाषा सुरू ठेवू शकतो, परंतु त्याला त्यासोबत एक भारतीय भाषाही शिकावी लागेल.

सध्याच्या कक्षा ९ च्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची CBSE बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. या भाषेचे मूल्यमापन केवळ शाळा स्तरावर होईल.

इयत्ता 7 आणि 8 (सत्र 2026-27)

जेव्हा हे विद्यार्थी कक्षा 9 आणि 10 मध्ये पोहोचतील, तेव्हा त्यांनाही तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. जर त्यांनी आधीच दोन विदेशी भाषा निवडल्या असतील, तर त्यांना फक्त एक भारतीय भाषा जोडावी लागेल. या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेची CBSE बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही; त्याचे मूल्यमापन शाळाच करेल.

इयत्ता 6 वी (सत्र 2026-27) आणि त्यानंतरच्या बॅचेस

या विद्यार्थ्यांवर नवीन धोरण पूर्णपणे लागू होईल. तीन भाषांपैकी दोन भारतीय भाषा अनिवार्य असतील. जेव्हा हे विद्यार्थी इयत्ता 10 वी मध्ये पोहोचतील, तेव्हा त्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षाही द्यावी लागेल. यासाठी NCERT 22 अनुसूचित भारतीय भाषांमध्ये नवीन पुस्तके उपलब्ध करून देणार आहे.

कोणाला मिळणार सवलत?

– दिव्यांग (CwSN) विद्यार्थ्यांना कायद्यानुसार सवलत मिळेल.

– भारताबाहेरील CBSE शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषा शिकणे अनिवार्य नाही.

– परदेशातून भारतात परतणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भारतीय भाषेच्या नियमातून सूट मिळेल.

राज्य बदलल्यास काय?

जर पालकांची बदली दुसऱ्या राज्यात झाली, तर विद्यार्थी आपली पूर्वी निवडलेली तिसरी भाषा सुरू ठेवू शकतो. अशा वेळी संबंधित शाळेला शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल.

शिक्षकांची उपलब्धता

शाळा गरजेनुसार सध्याचे शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक तसेच ऑनलाइन किंवा हायब्रिड माध्यमाचा वापर करू शकतात.

थ्री लँगवेजवर CBSE चे स्पष्टीकरण

बोर्डाच्या मते, हा बदल NEP 2020 नुसार करण्यात आला आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा बोजा वाढवणे नसून, भारतीय भाषांना प्रोत्साहन देणे आणि भाषा शिकणे सोपे व रंजक बनवणे हा आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही बोर्डाने दिली आहे. CBSE ने स्पष्ट केले आहे की, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर थ्री-लँग्वेज पॉलिसीचा परिणाम होणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच विद्यमान अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या अतिरिक्त बोर्ड परीक्षेची चिंता विद्यार्थ्यांना राहणार नाही.

follow us