Delhi Assembly Election Result : आम आदमी पक्ष अन् काँग्रेसचा पराभव; इंडिया आघाडीत ‘महाभारत’
![Delhi Assembly Election Result : आम आदमी पक्ष अन् काँग्रेसचा पराभव; इंडिया आघाडीत ‘महाभारत’ Delhi Assembly Election Result : आम आदमी पक्ष अन् काँग्रेसचा पराभव; इंडिया आघाडीत ‘महाभारत’](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/07/arvind-kejriwal-rahul-gandhi_V_jpg--1280x720-4g.webp)
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. तब्बल 26 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. सकाळी 11 वाजताच्या आकडेवारीनुसार, 70 पैकी भाजपने तब्बल 40 तर आम आदमी पक्षाने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतरआता इंडिया आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका केली आहे. (Former Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah has criticized the Congress and the Aam Aadmi Party after the defeat in Delhi.)
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ‘महाभारत’ मालिकेतील एक दृश्य शेअर करत अब्दुल्ला यांनी टीका केली. अब्दुल्ला यांनी फक्त एवढेच लिहिले, ‘या आपसात लढा!’
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
अब्दुल्ला यांच्या या टीकेमागे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये न झालेल्या आघाडीचे कारण असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडी कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंह या आपच्या दिग्गज नेत्यांना केंद्रीय यंत्रणेनी केलेल्या अटकेमुळे दिल्लीच्या निवडणुकीला दोन्ही पक्ष इंडिया आघाडी म्हणून समोरे जाईल, असे वाटत होते.
करावल नगर, मुस्तफाबाद अन् बाबरपूर.. 11 मुस्लीमबहुल मतदारसंघांत कुणाची जादू?
70 पैकी 15 जागा काँग्रेस आणि 1-2 जागा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांना दिल्या जातील. तर उर्वरीत जागांवर आम आदमी पक्ष, त्यांचे उमेदवार उभे करतील, अशा चर्चा होत्या. परंतु अरविंद केजरीवाल यांनी स्वबळाचा नारा दिला आणि काँग्रेससोबत लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली. इतकंच नाही तर चर्चाच बंद करून केजरीवाल यांनी उमेदवारांचीही घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसला धक्का बसला होता. आता निकालामध्ये आम आदमी पक्षाला याचा फटका बसताना दिसत आहे.
निकालात सद्यस्थितीमध्ये आम आदमी पक्षापेक्षा भाजपला पाच टक्के जास्त मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आपचा व्होट शेअर जवळपास 43.34 टक्के आहे तर भाजपचा व्होट शेअर 48 टक्के आहे. यातच काँग्रेसचा व्होट शेअर हा सात टक्क्यांच्या आसपास दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांची आघाडी झाली असती तर दोन्ही पक्षांना फायदा झाला असता, असे बोलले जात आहे.