पहलगाम दहशतवादी हल्ला, एकाच दिवसात तब्बल 70% टूर रद्द; अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसात 70 टक्केपर्यंत टूर रद्द झाले आहेत.यामुळे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर आब्दुला (Omar Abdullah) यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यटकांना राज्य सोडताना पाहणे हृदयद्रावक आहे असं मुख्यमंत्री ओमर आब्दुला यांनी म्हटले आहे.
लोकांनी बुकिंग रद्द केल्याने अमरावती (Amravati) येथील एका टूर ऑपरेटरला तब्बल 38 लाखांचा नुकसान सहन करावा लागला आहे. या हल्ल्यानंतर अमरावतीमधला टूर ऑपरेटर ग्राहकांना माता वैष्णोदेवी मंदिर आणि जम्मूमधील इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पटवून देताना दिसत आहे. पूर्वीही आम्ही महाराष्ट्रातून पर्यटकांना काश्मीरमध्ये आणायचो, परंतु कलम 370 रद्द केल्यानंतर आम्हाला सुरक्षित वाटत होते परंतु मंगळवारच्या हल्ल्याने क्षणार्धात सर्व काही उद्ध्वस्त केले. अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
तर जम्मूमध्ये भागीदारीत अॅपल टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवणारे 50 वर्षीय अमनीश शर्मा म्हणाले की त्यांच्या बुकिंगमध्ये 70 टक्क्यांनी घट झाली आहे. ते म्हणाले, “आम्ही उच्च श्रेणीतील पर्यटकांना एसी कॅब पुरवतो. व्यवसाय वाढत असल्याचा आम्हाला आनंद होता, पण आता अचानक सर्व काही बंद झाले आहे. आमचे 70 टक्के बुकिंग फक्त एका दिवसात रद्द करण्यात आले आहे.”
गुंतवणूकदारांना दिलासा, सेन्सेक्स 1 लाखांवर पोहोचणार; जाणून घ्या विश्लेषकाचा अंदाज
तर दुसरीकडे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, पर्यटकांना राज्याबाहेर पळून जाताना पाहणे “हृदयद्रावक” आहे. पहलगाम येथे काल झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर खोऱ्यातून आपल्या पाहुण्यांचे स्थलांतर पाहून मन हेलावून जाते, पण त्याच वेळी लोक का निघून जाऊ इच्छितात हे आम्हाला पूर्णपणे समजते.