…तर फुटलेले आमदार पुन्हा ममता बॅनर्जींचं नेतृत्व स्वीकारणार; माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांचं मोठं वक्तव्य
पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल पक्षात परततील आणि ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व मान्य करतील.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाचा (TMC) मोठा पराभव झाला. भाजपची सत्ता आली. पश्चिम बंगालची सत्ता तृणमूल काँग्रेसच्या हातातून निसटताच पक्षात मोठी फूट पडली. आधी आमदाराचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला. त्यानंतर तब्बल 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली.
काही दिवसांपूर्वी तर अशी देखील चर्चा सुरू होती की, ममता बॅनर्जी या आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करणार आहेत. परंतु आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी मोठं विधान केलं आहे.
ममता बॅनर्जींना मोठा धक्का; तृणमूलचे माजी खासदार भाजपमध्ये, कोण आहेत हे नेते?
रवींद्रनाथ घोष यांनी मोठा दावा केला आहे. जर ममता बॅनर्जी यांनी आपला भाच्चा अभिषेक बॅनर्जी यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं तर ज्या लोकांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये उठाव केला होता, त्यातील अनेकजण पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल पक्षात परततील आणि ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व मान्य करतील. ऋतब्रत बॅनर्जी हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी तब्बल 58 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला होता.
विधानसभा अध्यक्षाकडून या गटाला मान्यता देखील देण्यात आली होती. त्यानंतर रवींद्रनाथ घोष हे देखील पक्षातून बंडखोरी करत या बंडखोर गटात सामील झाले. एकीकडं बंडखोर गटाकडून पक्ष ताब्यात घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, असं असतानाच आता रवींद्रनाथ घोष यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात बंडखोर गटामध्ये देखील दोन गट पडणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच, ममता बॅनर्जी या आता अभिषेक बॅनर्जींबद्दल काय निर्णय घेणार हे देखील पहावं लागणार आहे.