अमेरिकेची भूमिका… जैसे थे! साखळदंड अन् हातात बेड्या, 116 भारतीयांसह दुसरं विमान अमृतसरमध्ये पोहोचलं

Second Batch of Illegal Indian Immigrants At Amritsar Airport : अमेरिकेने (America) बेकायदेशीर स्थलांतरितांची पुन्हा दुसरी तुकडी भारतात पाठवली आहे. अमेरिकेतून आलेल्या 116 बेकायदेशीर स्थलांतरितांचा (Illegal Indian Immigrants) दुसरा गट शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर (Amritsar airport) पोहोचला. यापैकी बहुतेक पंजाब आणि हरियाणामधील आहेत. गेल्या वेळीप्रमाणे, यावेळीही त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून आणण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली, पण तरीही अमेरिकेने आपली भूमिका कायम ठेवल्याचं दिसत आहे.
अमेरिकेतून हद्दपार करण्यासाठी 120 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे एक विशेष विमान शनिवारी रात्री उशिरा अमृतसर विमानतळावर उतरले. यापैकी 60 हून अधिक पंजाबमधील आणि 30 हून अधिक हरियाणातील आहेत. इतर गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या आणि ट्रम्प प्रशासनाने हद्दपार केलेल्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे.
अहिल्यानगरमध्ये कोतकरांना मोठा दणका! नेप्ती बाजार समितीवरून नाव हटवलं
यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे एक अमेरिकन विमान अमृतसरमध्ये उतरले होते. त्यापैकी प्रत्येकी 33 जण हरियाणा आणि गुजरात तर 30 जण पंजाबचे होते. अमेरिकेतून हद्दपार केलेल्या 157 भारतीयांना घेऊन जाणारे तिसरे विमान आज अमृतसरमध्ये उतरण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी 59 हरियाणाचे, 52 पंजाबचे, 31 गुजरातचे आणि उर्वरित इतर राज्यांचे आहेत.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, अमेरिकेतून हद्दपार केलेल्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या पहिल्या तुकडीला बेड्या ठोकल्याचं दिसून आल. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांवरील या गैरवर्तनावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत विरोधकांना आश्वासन दिलं होतं की, अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात आहे.
परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, सर्व निर्वासितांना उड्डाणादरम्यान अन्न आणि औषध देण्यात आले. अमेरिकेतून निर्वासित भारतीयांना घेऊन जाणाऱ्या विशेष विमानांच्या अमृतसरमध्ये लँडिंगवरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. अमृतसरमध्ये विमाने उतरवल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. महिला आणि मुले वगळता पुरुष निर्वासितांना हातकड्या आणि साखळदंडांनी बांधण्यात आले होते. तर भाजपने हा वाद फेटाळून लावत म्हटलंय की, विरोधी पक्ष हा मुद्दा जास्त वाढवत आहेत.