वांबोरी गटात भाजप महायुतीची जाहीर सभा; अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार
Rahuri Bye Election-महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारार्थ वांबोरी गटातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली.
Rahuri Bye Election: राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा (Rahuri Bye Election) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या प्रचारार्थ वांबोरी गटातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या खासदारांनी त्याला विरोध केला. हा पराभव नरेंद्र मोदी सरकारचा नसून देशातील महिलांचा आहे. त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकीत महिला या विरोधकांना धडा शिकवतील, असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, सरकार म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहोत. वांबोरी परिसरातील पाण्याचे योग्य नियोजन करून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. वांबोरी गटातील जनता नेहमीच आमच्यासोबत राहिली असून याही निवडणुकीत अक्षय कर्डिले यांना सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचे काम अक्षय कर्डिले करतील, असे सांगत त्यांनी सर्वांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
या सभेला आमदार काशिनाथ दाते, उमेदवार अक्षय कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, विनायक देशमुख, ॲड. तात्यासाहेब डोळसे, शिवाजी सागर, प्रा. शामराव पठारे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय गडाख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे जनतेमध्ये राहून काम करणारे नेतृत्व होते. त्यांनी स्वतःची काळजी न करता जनतेची सेवा केली. नगर तालुक्यावर त्यांची मजबूत पकड होती आणि जनतेशी थेट नाळ जोडली गेली होती. ते पुढे म्हणाले की, “मी आमदार होण्यात नगर तालुक्याचा मोठा वाटा असून त्याचे श्रेय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना जाते. वांबोरी गावाशी आमचे स्नेह संबंध असून येथील मतदार अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.
उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात मतदारांना भावनिक साद घालत सांगितले की, “माझ्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या. मी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गावागावातील बूथ प्रमुखांनी प्रचार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला.