हे यश तुमचंच, 4 जूनला जल्लोष करू; बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांना पत्र

हे यश तुमचंच, 4 जूनला जल्लोष करू; बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांना पत्र

Bawankule Letter To BJP Workers : देशभरात लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामध्ये एकून 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक होत आहे. त्यातील पाच टप्पे पार पडले आहेत. तसंच, राज्यातील टप्पेही पूर्ण झाले आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून कार्यकर्त्यांची निष्ठा, तळमळ आणि मेहनतीचं त्यांनी भरभरून कौतुक करतानाच त्यांच्या भावनेला हातही घातला आहे. त्याचबरोबर उद्याचा विजय आपलाच होणार आहे. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आह असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे भावनिक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरलं होत आहे.

 

Nashik Graduate Constituency :  भाजप कार्यकर्ते कसे विसरणार, काँग्रेसचा पदाधिकारी संतापला

काय आहे बावनकुळे यांचं पत्र

सप्रेम नमस्कार,

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं.. विकसित भारताचं. या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक आहे.

भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. ते कुटुंब आहे. आपणा सर्वांचं एकमेकांशी असलेलं नातं रक्ताच्या नात्यापलीकडचं आहे. या निवडणुकीत ही आपलुकी, जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवला. हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचं नियोजन, रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गणतीच नाही. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी- माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते.

प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गाव-खेड्यात आपण मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन पोहोचलो. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, अमित भाई शाह यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीर साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत गेला.

मित्रांनो, एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत, काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबलात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे. हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे.

आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. किंबहुना ते माझे कर्तव्य आहे असं म्हणत बावनकुळे यांनी 4 जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. तुम्हाला जशी आतुरता आहे, तसाच मी देखील उत्सुक आहे अशा शब्दांत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत भाजपच्या विजयाच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज