लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान सरकार… राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान सरकार… राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

Raju Shetti : शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा योजना अशा काही योजना आहेत. तसेच अतिवृष्टीग्रस्त अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले.

शेट्टी यांनी ट्विट करत सरकारचे वाभाडे काढले आहेत. शेट्टी म्हणाले, लबाड लांडगं ढोंग करतंय, गतिमान वेगवान सरकार असल्याचं सोंग करतंय. पीकविमा मिळेन, ऊसाचा अंतिम हप्ता ठरेना, प्रोत्साहनपर अनुदानाचा मेळ लागेना. म्हणूनच सांगतो, शेतकऱ्यांनो कोल्हापूरच्या जनता दरबारात याचा जाब विचारायला यायला लागतंय.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभुमीवर ऊस दर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नसल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. यासंंदर्भात त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदनही दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू. शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं आहे या संदर्भात शासनान तातडीने खुलासा करावा अशी मागणी करताना मुख्यमंत्र्यांनी दौऱ्याआधी प्रश्न मिटला नसल्यास स्वाभिमानी स्टाइलने आंदोलन करू असा इशाराही शेट्टी यांनी दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube