अजितदादांना भोपळा, बारामतीतही धक्का?, महायुतीच्या मिशनला ‘जोर का झटका’

अजितदादांना भोपळा, बारामतीतही धक्का?, महायुतीच्या मिशनला ‘जोर का झटका’

Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना महायुतीला हादरे देणारा सर्वे आला आहे. सीव्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर महायुतीत सहभागी होऊन अजित पवार यांनाही काही फायदा होणार नाही असाच सूर या सर्वेतून समोर आला आहे. आगामा लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  तर दुसरीकडे या सर्वेमुळे महाविकास आघाडीत मात्र ‘फिलगुड’ वातावरण निर्माण झालं आहे.

Lok Sabha Election: एकनाथ शिंदें अजितदादांना मोठा धक्का! कोणाला किती जागा ?

या ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुतीचे 45 प्लसचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांना मिळून फक्त 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना एकूण 18 जागा मिळतील असा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीला मात्र एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज या पोलद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला. सोबत आमदार खासदारांचा मोठा गट घेतला. यातील काही नेत्यांना सरकारमध्ये मंत्रिपदे मिळाली. स्वतः अजित पवार यांनी अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळवलं. त्यानंतर लोकसभेच्या जागावाटपात बारामती, रायगड, शिरुर यांसारख्या महत्वाच्या जागा पदरात पाडून घेतल्या. येथे मनासारखे उमेदवारही दिले. आता इतकं सगळं केल्यानंतर विजयाची खात्री अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. परंतु, या पोलने त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळवल्याचे दिसत आहे.

बारामती रायगडात अजितदादांना धक्का

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता येणार नाही असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला. बारामती आणि रायगड या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघातही अजितदादांना धक्का बसताना दिसत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारतील असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

Sangli Lok Sabha : “मी माघार घ्यायला तयार पण..” विशाल पाटलांच्या गुगलीने ‘मविआ’ कोंडीत

जर-तरच्या समीकरणात दिलासा

अजून उमेदवार घोषित न झालेल्या जागांपैकी नाशिकची जागा अजित पवार गटाकडे गेली तर या एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळू शकतो. तर रत्नागिरी, पालघर, दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा चार जागी भाजप तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार विजयी होऊ शकतात अशी शक्यता आहे. अशा एकूण 30 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. अद्याप काही मतदारसंघात उमेदवार घोषित झालेले नाहीत. त्याआधीच हा पोल घेण्यात आला आहे. त्यामुळे या पोलमधील अंदाज खरा ठरेलच असेही नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज