उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंही एकत्र येऊ शकतात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

Pratap Sarnaik : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) विजयी मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले होते. दरम्यान मनसे (MNS) आणि ठाकरे गटाची (UBT) युती होणा अशा चर्चा सुरू झाल्या. अशातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेही एकमेकांना मिठी मारतील, राजकारणात कुणीचं कुणाचं कायमचं शत्रू किंवा मित्र नसतं असं ते म्हणाले. सरनाईक यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
प्रताप सरनाईक यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरेंविषयी बोलताना ते म्हणाले की, आज तुम्हाला जे चित्र दिसतं, तेच उद्या असेल असं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचेच पाहा. १९ वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहत नव्हते. हसत नव्हते. बोलत नव्हते. आता ५ जुलै रोजी मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो. पण, त्यासाठी वाट पाहावी लागेल, असं ते म्हणाले.
विकेंडला सैयाराचं तूफान! बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घालत केली बक्कळ कमाई
पुढं ते म्हणाले, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र राहत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात, असं सरनाईक म्हणाले.
मी रमी खेळाचे समर्थन केले नाही
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. आमदार रोहित पवार यांनी दावा केला होता की, कोकाटे मोबाईलवर रमी खेळत होते. यानंतर प्रताप सरनाईक यांच्या प्रतिक्रियेवर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. यावर त्यांनी पुन्हा भाष्य केलं. ते म्हणाले, मी कुठल्याही खेळाचे समर्थन केले नाही. ऑनलाईन रमी खेळाची जाहिरात सेलिब्रेटी करत असतात. रमी खेळ मीही कुटुंबियांसोबत कधीतरी खेळत असतो. हा खेळ कौटुंबिक पातळीवर योग्य आहे. पण, त्याला जुगाराचे स्वरुप देणं चुकीचं आहे.
दरम्यान, अलिकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात राजकीय टोलेबाजी करत तुम्ही एकडे पाहिजे होता, असं सांगून अप्रत्यक्ष सत्तेत येण्याची ऑफर देऊन टाकली होती. त्यानंतर आता सरनाईकांनी शिंदे आणि ठाकरेही मिठी मारतील, असं विधान केलं. यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.