आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे? आम्हालाही मंत्रिमंडळात स्थान द्या; सदाभाऊ खोतांची मागणी
![आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे? आम्हालाही मंत्रिमंडळात स्थान द्या; सदाभाऊ खोतांची मागणी आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे? आम्हालाही मंत्रिमंडळात स्थान द्या; सदाभाऊ खोतांची मागणी](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/Sadabhau-Khot-1.jpg)
Sadabhau Khot On Expansion of the State Cabinet : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार (NDA Govt) आले. रविवारी एनडीएमधील मंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर काल मंत्रिमंडळ विस्ताराही झाला. त्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाला मंत्रिमंडळात मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र आता राज्य मंत्रिमंडळात घटक पक्षांनाही सन्मान दिला पाहिजे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. तसेच आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे? असा सवालही त्यांनी केला.
सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारले असता ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झालेला आहे. अजूनही राज्यमंत्रीपदाच्या कारभाराची जबाबदारी कुणालाही देण्यात आलेली नाही. अशातच येत्या आठवडाभरात राज्यात उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांनाही देखील सन्मान मिळाला पाहिजे, असं खोत म्हणाले.
पुढं बोलतांना सदाभाऊ खोत म्हणाले, या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे? याला देखील निर्धंध असणं खूप गरजेचं आहे. शेतमजूर, बाराबलुतेदार यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना तो सन्मान देणं गरजेचंआहे. हे सर्व असेच चालू राहिलं तर आमच्या कार्यकर्त्यांमध्येही नैराश्य निर्माण होईल. हे होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे खोत म्हणाले.
राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, ‘घाईगडबडीत राहून गेलं…’
14 जणांना मिळणार संधी…
दरम्यान, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 43 असू शकते. सध्या 29 मंत्री आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात 14 जणांना संधी दिली जाऊ शकते.