नदी शुद्धीकरण अन् कत्तलखान्यांना विरोध, ‘तो’ अजेंडा राबवणाऱ्यांवर वॉच; वारकरी संस्थांचं काय ठरलं?

Maharashtra News : मोशीतील कत्तलखान्यासंदर्भात सरकारने लेखी आदेश प्रसिद्ध करावा, वारीत प्रबोधनाच्या नावाखाली अपप्रचार करणाऱ्या स्वतःचा वेगळा अजेंडा चालवणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा, राज्यातील नद्यांचं पाणी पिण्याइतकं शुद्ध असावं, देवदेवतांवरील विडंबनाविरोधात कडक कायदा करावा, धर्मांतरण थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत अशा मागण्या वारकरी संस्था, संस्थान, संप्रदाय आणि संघटनांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते.
राज्यातून दरवर्षी हजारो पालख्या पंढरपूरला जातात. यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मोठ्या आहेत. या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरीला जातात. गर्दी जास्त असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही लोक आपलं खोटं नाणं चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करतात. त्यांचा बुद्धीभेद करतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत.
मागच्या वर्षी आम्ही सगळे मुंबईला गेलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) भेटलो. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की कत्तलखाना होणार नाही. त्यानंतर या आदेशाची अधिकृत ऑर्डर येण्यास चार महिने लागले. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची शाश्वती नाही. आमचा सरकारवर अविश्वास नाही. सरकारनं तत्काळ कार्यवाही करावी इतकीच आमची विनंती आहे, असे बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.
कत्तलखान्याची वीटही रचू देणार नाही
वारकऱ्यांच्या मेळ्यात अनेक संघटना आणि संस्था आपला वेगळा अजेंडा घेऊन सहभागी झाल्या आहेत. याकडे वारकऱ्यांचे फारसे लक्ष जात नाही. पालखी ज्या ठिकाणांवरुन जाते त्या बऱ्याच ठिकाणी मांसाहाराची दुकानं सुरू असतात. यासंदर्भात काहीतरी कायदा होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी पालखी जाते किमान त्या दिवशी तरी दुकानं बंद असावीत. मद्याची दुकानं चालू असतात ती बंद असावीत.
आळंदीत कत्तलखाना होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
इंद्रायणी नदी स्वच्छतेचाही मुद्दा गंभीर आहे. श्री क्षेत्र देहू येथे इंद्रायणी प्रदूषित केल्याने नगरपंचायतीला दंड झाला आहे. समाज जागृत झाला म्हणून ही गोष्ट घडली आहे. आज देहूत जे पाणी आपण स्नानासाठी सुद्धा घेऊ शकत नाही असं पाणी भाविकांना प्यावं लागत आहे. राज्यात कुठेही कत्तलखान्याची वीट वारकरी संप्रदाय कधीही रचू देणार नाही हा सरकारला इशारा आहे. तसं जर झालं तर 2013 च्या आंदोलनाची पुनरावृत्ती पुन्हा होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
‘तो’ अजेंडा राबवणाऱ्यांवर वॉच ठेवणार
काही लोकं दिंडीत सरकारचा पैसा वापरतात. सरकारचा निधी घेतात काम करताना मात्र एखादं गोंडस नाव देऊन त्यात सनातन धर्माच्या विचारांना बगल देणारं, हिंदू संस्कृतीला बगल देणारं, हिंदू समाजात जातीयवाद पसरवणारं, प्रबोधनाच्या नावाखाली काहीतरी समोर आणून पण ते प्रबोधन नसतं तर बुद्धीभेद असतो अशा लोकांचा बुरखा फाडणं हे वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे. अशा गोष्टी वारकरी संप्रदाय कधीही होऊ देणार नाही.
अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक गट तयार केला आहे. जे लोकं अशा पद्धतीने विचार पसरवत असतील त्या लोकांना शासनाने आळा घालावा. ज्या लोकांवर नक्षलवादाचे गुन्हे दाखल आहेत. जे लोक नक्षलवादात सापडले आहेत अशा लोकांना पुढं करुन जर काही केलं जात असेल तर या गोष्टी वारकरी संप्रदाय कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कत्तलखाना बंदचा लेखी आदेश यावा, वारीच्या नावाखाली अपप्रचार करण्यासाठी स्वतःचा अजेंडा सिद्ध करण्यासाठी नास्तिकवादी, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीवाले असू द्या या सगळ्यांवर वारकरी संप्रदायातील युवक लक्ष ठेवतील, पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींनीही तशा योजना केल्या आहेत. सरकारनेही या प्रकारांकडे लक्ष दिले पाहिजे. या प्रकाराची चौकशी केली पाहिजे, अशी अपेक्षा हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…; मिटकरींचा दावा