तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा, विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीच; आशुतोष काळेंची ग्वाही

  • Written By: Published:
तुमचे आशीर्वाद पाठीशी ठेवा, विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीच; आशुतोष काळेंची ग्वाही

Kopargaon Politics : जनतेने दिलेल्या संधीचे सोनं करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत प्रश्न बहुतांशी सोडविले. परंतु अजूनही काही प्रश्न सोडवायचे बाकी आहेत. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. त्यासाठी आपले आशीर्वाद पाठीशी ठेवा, मतदारसंघाच्या विकासाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही आ. आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारचे सोशल इंजिनिअरिंग जोरात : चार समाजांसाठी घेतले मोठे निर्णय 

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आशुतोष काळे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रजीमा ४ चे ब्राम्हणगाव-टाकळी-कोपरगाव-कोकमठाण-सडे-शिंगवे या रस्त्याच्या ४ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन, २.५० कोटी निधीतून पुणतांबा रोड (रा.मा.३६) ते कारवाडी (प्रजीमा ९१) मध्ये सुधारणा करणे व मोजे तीन चारी (कोकमठाण) येथे ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी लाईन स्थलांतरित करणे आदी कामाचा शुभारंभ आमदार काळेंच्या हस्ते करण्यात आला. तसेच दिव्यागांना निधीचे वाटप करण्यात आले.

लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान 

विकासाचा अनुशेष भरून काढला…
काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघाला काळे परिवाराने आपले कुटुंब मानले असून मतदारसंघातील सर्व नागरिक आमच्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुखी ठेवण्यासाठी काळे परिवाराने नेहमीच प्रयत्न केले. काळे परिवाराचा हाच वारसा पुढे चालवितांना मागील पाच वर्षात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. विकासाचा अनुशेष भरून काढतांना जास्तीत जास्त निधी मतदार संघासाठी कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न करून मतदार संघातील काही दशकापासून प्रलंबित असणारे विकास कामे पूर्ण केली.

रस्ते चकाचक केले
गंगागिरिजी महाराज यांच्या १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या वेळी येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्याची अडचण जाणवू नये यासाठी कोकमठाण गावातील बहुतांश रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून रस्ते चकाचक केले. पुन्हा चार कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करीत आहोत. कोकमठाण व परिसराचा विजेचा प्रश्न सोडविला. आता ५५कोटीच्या पाणी योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला असून त्याला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं काळे म्हणाले.

विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देवू नका
कोकमठाणच नाही तर मतदारसंघातील प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. त्यामुळे पाच वर्ष विरोधकांकडे बोलायला काहीच नव्हते. मात्र येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते जरी आरोप करीत असले तरी ही लोकशाही आहे. लोकशाहीत विरोधकांना आरोप करावे लागतात. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देवू नका. आपल्याला अजून विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे, असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे पदाधिकारी, कोकमठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube