LokSabha Election : साताऱ्यात उलथापालथ!; …तर उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार?

  • Written By: Published:
LokSabha Election : साताऱ्यात उलथापालथ!; …तर उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार?
सातारा : शरद पवार यांची २०१९ मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवतेय? (Satara Lok sabha constituency)  होय. याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा उदयनराजे (Udayanraje) यांना बसला. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा ६० हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या सहा महिने आधी याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार केले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvsi) यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला. उदयनराजे यांनी या आग्रहाला बळी पडत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात शरद पवार यांचे वर्गमित्र आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धूळ चारली. (Udayanaje Bhosale May Contest On NCP Ticket)
हे सारे सांगण्याचे कारण एकच. ते म्हणजे हा पराभव उदयनराजे यांना अजून डसतोय. त्यांना या पराभवाची परतफेड करण्याची इच्छा आहे. त्या पराभवानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदार केले. पण जनतेतून पुन्हा निवडून जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या या इच्छेमध्ये  नवीन राजकीय सोयरिक आडवी आली आहे. भाजपने अजित पवार यांच्याशी युती केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार, याचा घोळ आहे. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांनी लोकसभेच्या चार जागा आधीच मागून घेतल्या आहेत. त्या म्हणजे रायगड, बारामती, शिरूर आणि सातारा. या जागांवर राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाव्यात, अशी अजित पवारांची ठाम मागणी आहे.
दुसरीकडे  शरदचंद्र पवार यांचाही पक्षही जागा लढविणार आहे.  विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणुकीच्या  रिंगणात उभे राहावे, असा आग्रह पवारांनी धरला आहे. मात्र, वयोमान झाल्यामुळे पाटील स्वतः त्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांनी आपला मुलगा सारंग पाटील यांना उमेदवारी पक्षाने द्यावी, असा सूर  लावला आहे. पण तो मान्य होण्याची शक्यता कमीच. त्यामुळे श्रीनिवास पाटील हे पुन्हा फेटा बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. 
महायुतीतील अजित पवार यांच्या पक्षाकडेही फारसा प्रबळ उमेदवार नाही. आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे नाव या संदर्भात घेतले जाते. त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे देखील याच मतदारसंघातून खासदार होते. पण नितीन पाटील यांनी उमेदवारीसाठी आणि पूर्वतयारीसाठी फार जोर लावलेला दिसत नाही. 
शिवसेनेने अनपेक्षितरित्या या मतदारसंघावर दावा केला. जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. जाधव यांनी या आधीच्या काही निवडणुकांत उदयनराजे यांना चांगली टक्कर दिली होती. महायुतीतील हे दोन पक्षच साताऱ्यासाठी आ्ग्रही असताना भाजपमधून उदयनराजे यांनीही आपल्याला निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या इच्छेत आधी म्हटल्याप्रमाणे जागावाटपाचा अडसर आहे. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यात साताऱ्यात होते. त्यावेळी ते आवर्जून उदयनराजे यांच्या जलमंदिर या महालात गेले. तेथे त्यांचे जोरदार स्वागत झाले. उदयनराजे आणि फडणवीस यांच्यात वेगळी केमिस्ट्री आहे. ती यावेळीही दिसून आली. फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वादही घेतले. त्याचवेळी उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे वातावरण निर्माण झाले. फडणवीस यांनी त्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक विकासकामांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. महायुतीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते या कार्यक्रमांना उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी फडणवीस हे उदयनराजे यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल सूचकपणे बोलतील, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण त्यांनी कोणताच सिग्नल दिला नाही. साताऱ्याची जागा भाजपकडे येणार की नाही यावरही त्यांनी कोणतेच भाष्य केले नाही.
याचा अर्थ अनेकांनी आपापल्या परीने घेतला. साताऱ्याची जागा भाजपला मिळणार नसल्याचेच फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्टवादीकडेच राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या साऱ्या परिस्थितीत उदयनराजे यांच्या लोकसभेवर जाण्याच्या इच्छेचे कसे होणार?, याचीच आता उत्सुकता राहिली आहे. महायुतीमध्ये मतदारसंघांची अदलाबदल होणार आहे.
शिवसेनेकडील काही जागा भाजपकडे येऊ शकतात. तसेच भाजपकडील एखादी जागा मित्रपक्षाकडे जाऊ शकते. जेथे जागांची अदलाबदल होणार नाही तेथे काय? अशा ठिकाणी मग आपल्या मित्रपक्षातील सर्वात इच्छुक नेता आयात करण्याचा मार्ग आहेच. आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादीकडे जाणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रबळ दावेदार होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला मिळत नसल्याने ते आता ऱाष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. असेच मग साताऱ्यात होणार? तर होऊ शकते. त्यामुळेच उदयनराजे हे पुन्हा राष्ट्रवादीत येऊन लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. पण त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल.
भाजपचे नेते त्यासाठी तयार होतीलही. पण यात अडचण दुसरीच आहे. अजित पवार आणि उदयनराजे यांच्यात फार सुसंवाद नव्हता. अजित पवार हे साताऱ्याचे पालकमंत्री असताना दोघांचेही बिनसले होते. पण राजकारणात शत्रुत्व फारकाळ टिकत नाही. राजकीय सोयीसाठी नेहमीच नेते आपल्या वादांना मुरड घालतात. तसेच साताऱ्यातही होऊ शकते. म्हणूनच उदयनराजे हे राष्ट्रवादीत जातील, ही शक्यता फेटाळून लावता येत नाही.
 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube