‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले; CM फडणवीस म्हणाले, ” आता आम्ही मंगळवारी एक..”

‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले; CM फडणवीस म्हणाले, ” आता आम्ही मंगळवारी एक..”

Devendra Fadnavis on Mahadevi Elephant : कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनताराकडे सुपूर्द (Mahadevi Elephant) करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कार्यवाही करण्यात आली. परंतु, या प्रकरणात आता नवीन माहिती हाती आली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी (Kolhapur News) स्वाक्षरी मोहीम सुरू केली. त्यानंतर आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. दरम्यान, या घडामोडींवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. यात शासनाचा काहीही संबंध नाही. तरीदेखील या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी एक बैठक बोलावण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावतीत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. महादेवी हत्तीणीच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा काही शासनाचा निर्णय नाही. यासंदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्यावर मुंबई उच्च न्यायालयात एक पिटीशन झाली. प्राण्यांच्या संदर्भात काही विषय त्यात मांडण्यात आले. त्या आधारावर न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.

सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत या हत्तीणीला वनतारात ठेवा अशा प्रकारे हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाची कोणतीही भूमिका नाही. पण तरीही समाजात त्या संदर्भात एक रोष आहे. भाविकांच्या मनात भावना आहे की त्यांना त्याच परिसरात त्यांचं अस्तित्व हवं आहे. या संदर्भात तेथील आमदार आणि खासदारांनी माझ्याशी चर्चा केली. मंगळवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे. यात कायदेशीर काय तरतुदी आहेत कशा प्रकारे हत्तीण परत आणता येईल किंवा आणखी वेगळं काय करता येईल या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले, पदयात्रेत हजारोंचा सहभाग; खासदारांनीही दिली आनंदाची बातमी

प्रकरण काय?

मिरवणुकीसाठी वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी हत्तीणीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप ‘पेटा’ ने केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने हत्तीणीची पाहणी करुन अहवाल सादर केला होता. या अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube