निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा (BJP) युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदीगड उच्च न्यायालयाने (Chandigarh High Court) मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या 48 तासात नियम 93 बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी 58 टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी 65 टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ 8 टक्क्यांची असून ते जवळपास 76 लाख मतदान आहे. हे 76 लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी 5 नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच 17 डिसेंबर 2024 ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम 93 मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम 93 नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या.
19 डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री 10:23 वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला.
‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर वॉर; शिंदे शिवसेनेकडून ठाकरेंवर टिका
मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.