तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले

Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. यावेळी दिपक पवार यांनी शिवसेना (Shivsena), मनसे (MNS) आणि भाजपवर हल्लाबोल केलाय.
रक्ताची चटक लागली
दीपक पवार यांनी ( Deepak Pawar) म्हटलंय की, लोकं म्हणतात की, इंग्रजीच्या वेळेस तुम्ही काही बोलले नाही मग हिंदीच्या वेळी का बोलत आहे? हिंदीची स्क्रिप्ट देवनागरी आहे. शिक्षकांनी म्हटलंय की, दोन्ही भाषेंचं व्याकरण काही बाबतीत सारखं आहे, काही बाबतीत वेगळं आहे. हिंदी जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. ती जास्त लोकांकडून का बोलली जाते, तर या भाषेने उत्तर भारतातील भाषा गिळंकृत केलंय. या भाषेच्या तोंडाला रक्ताची चटक लागली आहे. तीचं पुढचं लक्ष्य आता बारा कोटी लोकांची मराठी भाषा आहे.
मराठीपण पूर्ण संपलेलं आहे
गेल्या काही पंचवीस वर्षांमध्ये मराठी लोकांना देखील त्यांची व्यापक पातळीवरील चूक कळून आली आहे. यामुळे इंग्रजी सक्तीच्या वेळेला शांत बसलेले लोकं आता गप्प बसणार नाही. अनेक लेखक, कलाकार किंवा इतर काही लोकं या मुद्द्यावर शांत आहेत. कारण त्यांची मुलं मराठी शाळेत गेलेली नाहीत किंवा ते आश्रित आहेत. त्यांचे हिंदी भाषेसोबत हितसंबंध जोडले गेलेले आहेत. त्यांची भूमिका माय मरो अन् मावशीच जगो, अशी आहे. हिंदी व्यवहारांत आलीय, शाळेंत आलीय. दादा भुसे म्हणाले की, सहावीत हिंदी शिकतोच ना. हा आग्रह का आहे? त्यांना वाटते की, हिंदी शिकल्याशिवाय आमच्या राजकीय अंगठ्याखाली येणार नाहीत. भाजपचे सरकार आहे, ते दोघे तर उघडे आहेत. त्यांचा स्वाभिमान ते गुवाहाटीला विकून आलेत किंवा सत्तर हजार कोटींमध्ये विकून आले. या मंडळींचं मराठीपण पूर्ण संपलेलं आहे.
दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी तुमची योग्य वेळ… राऊतांचा फडणवीसांवर घाव
शिवसेनेचं आंदोलन का नाही झालं?
इथे राज ठाकरे (Raj Thackeray) बोलले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कडेकडेने बोलले. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, आम्ही काहीतरी करू. काहीतरू करू म्हणजे काय? तुमच्या वडिलांनी मराठी माणसांसाठी पक्ष काढला. तुमचे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय होते. मग तुम्ही तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांमध्ये बालभारतीच्या कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन का नाही झालं? शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर शिवसेनेचं आंदोलन का नाही झालं? असा सवाल देखील दीपक पवार यांनी केलाय.
मराठी भाषेचं राजकारण
मराठी भाषा राजकीय मुद्दा होत नाही, कारण शिवसेनेच्या काळात दाक्षिणात्यांनी आमच्या नोकऱ्या बळकावल्या म्हणून मर्यादित होतं. राज ठाकरेंच्या काळात उत्तर भारतीयांनी टॅक्सी घेतल्या, पाणीपुरीच्या गाडी घेतल्या म्हणून होतं. शिवसेनेच्या काळात यांनी उडप्यांची हॉटेलं फोडली. चार-दोन दुकांनांना डांबर फासलं. राज ठाकरेंच्या लोकांनी चारवेळा रिक्षावाल्यांना मारलं. मारलंय फक्त चारच वेळेला पण टेलिव्हिजिन चॅनलवाल्यांनी ते हजारवेळा रिपीट करून दाखवल्यामुळं हजारो वेळा या लोकांना मारहाण झाली, असं चित्र निर्माण झालंय. या दोन पक्षांचं राजकारण अतिशय संकुचित स्वरूपाचं आहे. यांना मराठी भाषेचं राजकारण कसं करायचं याची स्पष्टता नाही. राज ठाकरेंना ठरवता येत नाही की, मशिदीवरील भोंगे महत्वाचे आहेत, हनुमान चालीसा महत्वाचा आहे की, वर्गात न शिकवली जाणारी मराठी महत्वाची आहे. हा कॉल राज ठाकरेंनी घेतला पाहिजे. दोन दगडांवर पाय ठेवायचा. आत स्नेहभोजन द्यायचं, उद्या हॉटेलात भेटायचं, परवा आंदोलन करतो म्हणायचं.
हिंदूत्वावर लाथ मारा अन्…
याप्रकारची त्रिस्तरीय लबाडी मराठी माणूस मान्य करणार नाही. शिवसेनेच्या बाबतीत ते म्हणजे उद्धव ठाकरे सारखे बोंबलत सांगत आहेत, आम्ही हिंदू आहोत. दिल्लीत गुजरातचे दोन माफिया स्वत:ला सर्वात मोठे हिंदू सांगतात. तिथे तुमचं दुकान लागण्याची शक्यताच नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगू शकणार नाही. तुम्हाला जगण्याचा एकच मार्ग आहे. हिंदूत्वावर लाथ मारा अन् मराठीच्या मुद्द्यावर परत या. पण हे दोघे येवोत न येवोत, हिंदी सक्तीसारख्या मुद्द्यावर मराठीचं नवं राजकारण उभंच राहिलं पाहिजे, असं दीपक पवार यांनी म्हटलं आहे.