‘हेल्पलाइनशी संपर्क साधा’…. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी CM फडणवीसांचा अॅक्शनमोड, क्रमांक जारी

Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, जेणेकरून काश्मीरमध्ये (Kashmir) पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना सुरक्षितपणे परत आणता येईल.
राज्य सरकारने एका निवेदनात म्हटलंय की, पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यरत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरहून मुंबईत आणले जात आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील मृतांचे मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचतील. तेथून त्यांना रुग्णवाहिकेने त्यांच्या संबंधित ठिकाणी पाठवले जाईल. या प्रक्रियेत आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारकडून केली जात आहे.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी आणि महाराष्ट्रातील त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तात्काळ 022-22027990 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती
व्यवस्थापन कक्षाने केले आहे. सरकारने काश्मीर (श्रीनगर) चे आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील शेअर केले आहेत. पर्यटकांना मदत करण्यासाठी, श्रीनगर जिल्हा प्रशासनाने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात चोवीस तास कार्यरत असणारा मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कुठे झाला?
पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन हे पाइन वृक्ष आणि पर्वतांच्या घनदाट जंगलांनी वेढलेले एक विशाल गवताळ प्रदेश आहे. देश आणि जगभरातील पर्यटकांमध्ये ते एक आवडते ठिकाण आहे. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळी सशस्त्र अतिरेकी आले. त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या, खेचरांवर स्वार होऊन पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार केला. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात किमान 20 जण जखमी झाले.
नवविवाहित लेफ्टनंट नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत, प्लॅन होता यूरोपचा पण…
हल्ल्यामागे कोण?
पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी संघटना, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी गट जम्मूतील किश्तवाडहून दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग मार्गे बैसरन येथे पोहोचला असण्याची शक्यता आहे.