धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे

Heavy rain in the 48 hours Kokan And Ghatmatha : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (14 जून) कोकणसह घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon Update) असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट (Rain Update) जारी करण्यात आला आहे.
कमी दाबाचा पट्टा
राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव असून, त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्याचप्रमाणे, कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा भागांमध्येही हवामानात अशाच प्रकारची स्थिती आहे. अरबी समुद्र ते ओडिशा किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा पसरलेला असून, यामुळे राज्यात पावसाला चांगली चालना मिळाली आहे.
शुक्रवारी (13 जून) सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भातील नागपूर येथे सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा
जोरदार सरींची शक्यता
आज (14 जून) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतही जोरदार सरींची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रगती 26 मेपासून थांबलेली आहे. सध्या मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांपर्यंतच मॉन्सून पोहोचला असून, त्यापुढील वाटचाल 18 दिवसांपासून स्थिर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून (15 जून) विदर्भासह छत्तीसगड व ओडिशाच्या काही भागांत, तर सोमवारी (१६ जून) गुजरातसह पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्येही मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.