‘राज्यात ट्रिपल इंजिन नाही तर तीन पायांचं जनावर सत्तेत’; काँग्रेस नेत्याचा खोचक टोला

P. Chidambaram on Maharashtra Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचा गट सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात आता तीन इंजिनचे सरकार असल्याचा दावा शिंदे गट व भाजपातील नेते मंडळी करत आहेत. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते या सरकारवर टीका करत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी या सरकारची खिल्ली उडविली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दावा करतात की त्यांचे सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. हे मला शंभर मीटरच्या शर्यतीत धावणाऱ्या तीन पायांच्या जनावरासारखे वाटते. राज्यातील नऊ नवीन मंत्र्यांना कोणतेही काम नाही कारण, त्यांना खात्याचे वाटप झाले नाही, असे चिदंबर म्हणाले.
महाराष्ट्र के सीएम और दोनों डिप्टी सीएम का दावा है कि उनकी सरकार ट्रिपल इंजन वाली सरकार है।
यह मुझे तीन पैरों वाले जानवर की तरह लगता है जो 100 मीटर की दौड़ में दौड़ रहा है।
महाराष्ट्र में नौ नए मंत्रियों के पास कोई काम नहीं है, क्योंकि उन्हें विभाग आवंटित नहीं किए गए हैं।
श्री…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 13, 2023
फडणवीससहीत अन्य 20 मंत्र्यांपैकी कुणीही खाते सोडण्यास तयार नाहीत. यावर आता एकच तोडगा आहे तो म्हणजे नऊ नवीन मंत्री खाते नसणारे मंत्री असतील अशी घोषणा करावी, असे खोचक ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.
अजितदादांना अर्थखातं; गोगावले, शिरसाटांचा पत्ता कट?
शिंदे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिल्ली वारीनंतर त्यांच्या गटाला अर्थ आणि सहकार खातं मिळालं आहे. याशिवाय पुण्याचं पालकमंत्रीपदही अजितदादांच्या वाट्याला गेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर हा तोडगा निघाल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारातून रायगडचे आमदार भरत गोगावले आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याचंही या बड्या नेत्यानं सांगितलं. भरत गोगावले आणि संजय शिरसाट या वादग्रस्त चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा विरोध आहे. गोगावले यांनी नुकतचं आदिती तटकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. त्यानंतर भाजपचा विरोध आणखी तीव्र झाला. मागील काही दिवसांपासून याच दोन नावांमुळे विस्तार रखडला होता, अशीही माहिती या नेत्याने दिली.