CM फडणवीस अन् मुनगंटीवार बऱ्याच दिवसांनी निवांत भेटले; विधानसभा, लोकसभेनंतरची दरी मिटली….

प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.4) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला असून, भाजपचे हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनंतर निवांत भेटल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे आजची भेट आणि मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं स्मितहास्य हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर काही कारणांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी वर्षभरानंतर मिटल्याचे सांगत आहे. मात्र, दीर्घ कालावधीनंतर झालेल्या या भेटीचे फेसबुकवर फोटो टाकल्यामुळे ही भेट वरिष्ठांच्या आदेशानंतर तर झाली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, फडणवीसांचे कौतुक करताना मुनगंटीवार यांनी फडणवीसांसाठी अनेक विशेषणे वापरली आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांनी आता फडणवीस हेच आपले नेते आहेत हे अप्रत्यक्षरित्या तर सांगितले नाही ना? अशी ही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
हिंदी भाषेवरून मनसे पुन्हा ‘खळ्ळखट्याक’ च्या तयारीत; ठाकरेंनी थेट धाडलं दादा भुसेंना खरमरीत पत्र
फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये मुनगंटीवार यांनी विकासात्मक चर्चेला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच भेटीदरम्यान धान बोनस, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी, खतासोबत इतर उत्पादनांचे लिंकिंग थांबवणे, घरकुलासाठी मोफत रेतीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ, भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या, लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधीत वाढ, चंद्रपूर रिंगरोड, उर्जानगरमधील व्यायामशाळा व स्विमिंग पूल आदी विषयांवर निवेदने देत, सविस्तर चर्चा केल्याचे नमुद केले आहे. हे सर्व सांगताना मुनगंटीवार यांनी पोस्टमध्ये राज्याचे दूरदर्शी आणि लोकहितवादी मुख्यमंत्री असा फडणवीसांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले आहे.
लोकसभा, विधानसभेनंतर चव्हाट्यावर आला होता अंतर्गत वाद
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना लोकसेभची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. लोकसभेसाठी इच्छूक नसतानाही आपल्याला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते. या पराभवानंतरही पक्षाकडून मुनगंटीवार यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले होते. यात मुनगंटीवार यांनी विजयाचा गुलालही उधळला. परंतु, त्यांना फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळातून सपशेल वगळण्यात आले. एका ज्येष्ठ नेत्याला अशाप्रकारे वगळ्याबद्दल मुनगंटीवार यांनी जाहीरपण नाराजीही बोलून दाखवली होती.
भाच्याने भाजप प्रवेशाचे पत्ते झाकले, मामांचाही सस्पेन्स कायम; प्राजक्त तनपुरेंचा सूचक इशारा काय?
मुनगंटीवारांना दांडगा अनुभव
मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मत्स्य संवर्धन मंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. गेली दहा वर्ष ते सातत्यानं चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिलेले आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर, दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुनगंटीवारांना स्थान नसल्याची कल्पना दिल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते. मात्र, आपल्याला मंत्रिमंडळातून वगळणार असल्याची पुसटशी कल्पनाही देण्यात आली नसल्याचे म्हणत मुनगंटीवारांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. मुनगंटीवारांच्या या विधानानंतरच भाजपमधील अंतर्गत वाद आणि धुसफूस समोर आली होती. विशेष म्हणजे या नाराजी नाट्यानंतर मुनगंटीवार यांनी फडणवीस उपस्थित असलेल्या नागपूरमधील मारोतराव कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जाणे प्रकर्षाने टाळले हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनीमधील दुरावा अधिक वाढत गेल्याचे अधोरेखित झाले होते.
फडणवीसांच्या काकू शोभाताईंच्या कानपिचक्या
सात एप्रिला भाजपा स्थापना दिवस नागपूर शहरात दोन ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमावरून भाजपच्या जेष्ठ नेत्या, माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता कार्यक्रमात कानपिचक्या दिल्या होत्या. छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नये , मोठेपणासाठी रडू नका आशा प्रकारच्या शब्दात शोभाताई फडणवीस यांनी खडे बोल भर कार्यक्रमात सुनावले होते.
महायुती सरकार येवून पाच महिने झाले….पण, राज्यमंत्र्यांना अधिकारच नाही, थेट CM फडणवीसांना पत्र
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप सज्ज
फडणवीसांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी दोघांचाही हसराच फोटो पोस्ट होईल याची काळजी घेतली असून, चेहऱ्यावरील स्मितहास्यावरून दोन्ही नेत्यांमधील दुरावा संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी भाजप कामाला लागल्याचेही यातून अधोरेखित होत असून, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये याचीही खबरदारी पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे जर दोन्ही नेत्यांमधील नाराजी संपुष्टात आली असेल तर, मुनगंटीवारांना पक्षाच्यावतीने काही मोठी जबाबदारी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.