29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन; मनोज जरांगेंकडून राजकीय नेत्यांना थेट इशारा

Manoj Jarange Patil Mumbai Protest For Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोठं आंदोलन करण्यात येत (Mumbai Protest For Reservation) आहे. या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचं आयोजन होत असून, समाजाला एकवटण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. धाराशिव शहरात अशाच एका बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राजकीय नेत्यांना इशारा दिला.
या बैठकीत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुंबईतील आंदोलनात जो नेता येणार नाही, त्याला आगामी निवडणुकांमध्ये पाडा. मग ती नगरपालिका असो, पंचायत समिती असो की महापालिका. मराठा समाजाने त्याला मतांच्या जोरावर खाली खेचावं, असा थेट संदेश त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांना कठोर शब्दांत इशारा
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. आंतरवली सराटीमध्ये जे घडलं, ती चूक पुन्हा होऊ नये, असं आम्ही स्पष्ट सांगतो. जर पुन्हा अशीच काही भानगड केलीत, तर त्याचे परिणाम तुम्हालाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भोगावे लागतील, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
मला अभिनेते पंकज त्रिपाठी आवडतात; त्यांच्यासोबत…,मोदी सरकारला घेरणाऱ्या खासदार मोईत्रा चर्चेत
एकदा आमचं डोकं फुटलं आहे, अजूनही आमच्या अंगातून गोळ्या निघालेल्या नाहीत, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. आंतरवलीतील आया-बहिणींना दु:ख सहन करावं लागलं, काहींची गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली, काहींना मांड्यांवर टाके घ्यावे लागले. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी भावनिक साद जरांगे पाटील यांनी घातली.
केंद्र सरकारलाही दिला इशारा
मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं की, ही कुठल्याही प्रकारची धमकी नाही, तर साकडं आहे. फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला ओळखून आहात. जर आई-बहीण-पोरांवर हात उठला, तर मराठा समाज टोकाचा निर्णय घेईल. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटतील. त्यामुळे सरकारने वेळेवर योग्य तो निर्णय घ्यावा, असंही त्यांनी बजावलं.