‘निलेश लंकेंनी कानात काय सांगितलं?’ ‘गुगली’ प्रश्नावर रामभाऊंचं ‘सेफ’ उत्तर

‘निलेश लंकेंनी कानात काय सांगितलं?’ ‘गुगली’ प्रश्नावर रामभाऊंचं ‘सेफ’ उत्तर

Ram Shinde : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार होऊ लागलं आहे. दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनाच तिकीट मिळणार असे सांगितले जात असले तरी अद्याप फायनल नाही.  दुसरीकडे भाजपचेच आमदार राम शिंदे यांनीही (Ram Shinde) जोर लावला आहे. आता तर विखेंचे विरोधक आमदार निलेश लंके यांच्याबरोबरील त्यांच्या मैत्रीचे किस्से नगरकरांच्या तोंडी आहेत. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा या मैत्रीचा प्रत्यय दिला. निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. यानंतर पत्रकारांनी त्यांना दोघांमध्ये काय संभाषण झालं. निलेश लंकेंनी तुमच्या कानात काय सांगितलं, असा प्रश्न विचारल्या. त्यावर अगदी कसलेल्या राजकारण्यासारखं उत्तर देत शिंदेंनी वेळ मारून नेली.

राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

त्याचं झालं असं, आमदार राम शिंदे यांनी काल निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यास हजेरी लावली. त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठलं. निलेश लंके शेजारी बसले होते कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांनी तुमच्या कानात नेमकं काय सांगितलं? असा गुगली प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राम शिंदेंनीही  अगदी सेफ उत्तर दिलं.

ते तुम्हाला सांगता येणार नाही. कारण ते त्यांनी माझ्या कानात सांगितलं. ते मी ऐकलं आहे पण ते जाहीररीत्या सांगणं योग्य होणार नाही, अशा शब्दांत सेफ उत्तर दिलं. आता निलेश लंके यांनी राम शिंदे यांच्या कानात नेमकं काय सांगितलं याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत तर दोघांत काही चर्चा झाली नसेल ना, असेही तर्क लावण्यात येत आहेत.

यहाँ पे सब शांती शांती है !!! सुजय विखे-राम शिंदे अर्धा तास शेजारी बसले पण चकार शब्दही बोलले नाहीत

जिंकण्याची ताकद असलेल्याला तिकीट 

निलेश लंके लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. तुम्ही देखील इच्छुक आहात या प्रश्नावर शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नाही. याचं कारण म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आहे. आधी जागावाटप निश्चित होईल त्यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाईल. राज्यात काही ठिकाणी पक्ष निरीक्षक गेले होते. मी देखील धुळ्याला गेलो होतो. त्याचा अहवाल दिल्लीला पाठवण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळाची सभा झाली. त्यानंतर यादी जाहीर झाली. सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून जागावाटपाबाबत निर्णय घेतला जात असतो. ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील यादीत धक्कातंत्र ?

भाजपाच्या संभाव्य यादीत महाराष्ट्रात काही धक्कतंत्र पहायला मिळेल का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, आपण पाहिलं असेल की अनेक नावं बदलली आहेत. लोकांच्या भावनांचा विचार आणि निवडून येणारा उमेदवारच भाजप देत असतो यात काहीच तडजोड होत नाही आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 195 उमेदवारांची पहिली यादी आली आहे. अजून महाराष्ट्रातली यादी आलेली नाही. उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता हाच मुद्दा विचारात घेतला जाईल आणि त्यालाच तिकीट मिळेल. हीच भारतीय जनता पार्टीची रणनीती होती आणि राहिल. तसेच नवीन चेहरेही दिसतील, असे सूचक वक्तव्य आमदार राम शिंदे यांनी यावेळी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube