मशाल विझणार? शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा शिंदेंसोबत ‘हातमिळवणी’चा मुहूर्त ठरला
शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर – शिवसेनेचा वर्धापन दिन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच अनेक पक्ष फिरून पक्षात आलेले शिर्डी लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील दिल्लीत दाखल झाल्याची समजते आहे. यामुळे ठाकरेंची मशाल खाली ठेवत वाकचौरे धनुष्यबाण हाती घेणार हे निश्चित मानले जात आहे.
मेळाव्याला दांडी…मातोश्रीच्या बैठकीला पाठ
शिर्डी येथे घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला खासदार संजय राऊत हे आलेले असतानाही खासदार वाकचौरे यांनी याकडे पाठ फिरवली होती. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा झाली असताना खासदार फुटू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली
मात्र या बैठकीला एकदा नव्हे तर दोनदा वाकचौरे यांनी पाठ फिरवली. तसेच लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शिंदे सेनेच्या प्रवेशावर भाष्य टाळले यानंतर संशयाची सुई वाकचौरे यांच्या भोवती फिरू लागली. यामुळे ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आता अधोरेखित होत आहे.
ठाकरेंचा निर्णय चुकला…
शिर्डी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटात दाखल झाले. तिकीटासाठी त्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांनी साईबाबांची शपथ खोटी खाली होती अशांवर विश्वास ठेऊ नये व त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केली होती. तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या रूपवते या लोकसभेसाठी आघाडीकडून इच्छुक होत्या.मात्र ठाकरेंनी वाकचौरेंवर विश्वास दाखवला व पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकरेंनी उमेदवारीबाबत घेतलेला निर्णय चुकला अशी टीका आता सोशल मीडियावर होते आहे.
भाऊसाहेब वाकचौरे यांची राजकीय कारकीर्द
भाऊसाहेब वाकचौरे यांची ओळख प्रशासकीय अनुभव असलेले आणि नंतर राजकारणात सक्रिय झालेले नेते अशी आहे. ते श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. तसेच जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागातील विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली होती.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना तर्फे शिर्डी मतदारसंघातून विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही काळाने ते भारतीय जनता पक्ष मध्ये गेले.
2019 मध्ये भाजपशी त्यांचे संबंध तुटले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले.
अपना सपना मनी..मनी!…खासदारांना प्रत्येकी १५ कोटी
अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… प्रत्येकी १५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे अशा आशयाचे ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.