संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी; मनसेच्या पुस्तक प्रदर्शनातील हजेरी राष्ट्रवादीला खटकली

Sanjay Raut : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवले असता, राऊतांनी त्याच प्रसंगी कडाडून टीका केली. याचबरोबर संजय राऊतांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला जाऊन सहभाग घेणे त्यांच्या राजकीय निष्ठा आणि विचारधारेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या विरोधाभासी वागणुकीमुळे त्यांच्या विरोधकांमध्ये नाराजी पसरली आहे, अशी टीका शरद पवार गटाचे प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केली.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, ही वस्तुस्थिती सर्वश्रुत असतानाही संजय राऊत यांनी पुस्तक प्रदर्शनात उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे महायुतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोप होत आहेत. एका ठिकाणी महायुतीच्या विरोधात आग ओकायची दुसरीकडे त्यांच्या समर्थकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याची ही दुटप्पी भूमिका राजकीय प्रामाणिकतेबद्दल गंभीर प्रश्न उभे करते.
संजय राऊतांमुळेच शिवसेना ठाकरे गटाचं वाटोळं झालंय; राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट घणाघात
मातेले म्हणाले, “संजय राऊत यांनी स्वतःला मोठा राजकीय विश्लेषक समजण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कोणत्या विचारधारेचे आहेत हे त्यांना स्वतःच स्पष्ट माहित नाही. राजकीय मतभेद असतील तर ठामपणे विरोध करावा पण एका ठिकाणी शिवसेनेच्या गद्दारांना गद्दार म्हणणे आणि दुसरीकडे त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा प्रकार पूर्णपणे गैरसमजूतदार आहे.”
राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असे या टीकेचे मुख्य मुद्दे आहेत. संजय राऊत यांची ही कृती केवळ स्वार्थासाठी घेतलेला आणखी एक धक्कादायक पाऊल असल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
आधी महसूल मंडळांची फेररचना, नंतर अप्पर तहसीलचा निर्णय; मंत्री विखेंनी सांगितला प्लॅन