ADR Report : लोकसभेसाठी BJP ने 1494 कोटी खर्चले, कॉंग्रेस अन् NCP ने किती खर्च केला?

ADR Report : भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) २०२४ च्या लोकसभा (Lok Sabha Elections) आणि विधानसभा निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला आहे. भाजपने सुमारे १४९४ कोटी रुपये खर्च केलेत. तर ११ वर्षे केंद्रात सत्तेबाहेर राहिलेल्या काँग्रेसनेही (Congress) निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च केलाय. काँग्रेसने एकूण ६२० कोटी रुपये खर्च केले आहेत.
आता गावातील रस्त्याच्या तक्रारीसाठी क्यूआर कोड, फोटो काढा अन् पाठवा; मोदी सरकारचा निर्णय
खर्चात एकट्या भाजपचा ४४.५६% वाटा
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिपोर्ट (ADR)नुसार, एकूण निवडणूक खर्चात एकट्या भाजपचा वाटा जवळजवळ अर्धा आहे. एकट्या भाजपने एकूण निवडणूक खर्चापैकी ४४.५६% खर्च केला, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने ६२० कोटी रुपये खर्च केले, जे एकूण खर्चाच्या १८.५% होते. एडीआरने म्हटले आहे की राजकीय पक्षांनी ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला.
लोकसभा आणि चार विधानसभा निवडणुकांच्या खर्चाचा तपशील
१६ मार्च ते ६ जून २०२४ दरम्यान झालेल्या लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाची माहिती एडीआरने दिली आहे. एडीआरने म्हटले आहे की या निवडणुकांमध्ये एकूण ३३५२.८१ कोटी रुपये खर्च झाले. राष्ट्रीय पक्षांनी २२०४ कोटा रुपये खर्च केले, जे एकूण खर्चाच्या ६५.७५ टक्के आहे.
एडीआरने म्हटलंय की, सर्वाधिक रक्कम प्रचारावर खर्च झाली. अहवालानुसार, २ हजार कोटींहून अधिक रक्कम प्रचारावर खर्च झाली. सर्व पक्षांनी २००८ कोटी रुपये नुसते प्रचारावर खर्च केले. जे एकूण खर्चाच्या ५३ टक्के आहे. तर सर्व पक्षांनी प्रवासावर एकूण ७९५ कोटी रुपये खर्च केले. स्टार प्रचारकांच्या प्रवासावर ७६५ कोटी रुपये खर्च झाले, तर कार्यकर्त्यांवर फक्त ३० कोटी रुपये खर्च झाले.
धक्कादायक! 50 हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण; बीड पुन्हा हादरलं
राष्ट्रीय पक्षांनी जमवले ६९३०.२५ कोटी रुपये
एडीआरने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय पक्षांनी ६९३०.२५ कोटी रुपये जमवले होते. तर प्रादेशिक पक्षांनी ५१५.३२ कोटी रुपये उभारले. उमेदवारांना ४०२ कोटी रुपये रोख स्वरुपात मिळाले होते. उमेदवार आणि पक्षांनी व्हर्च्युअल प्रचाराच्या स्वरूपात १३२ कोटी रुपये खर्च केले.
६९० पक्षांनी केलेल्या खर्चाचा अहवालात समावेश नाहीच…
एडीआरच्या अहवालात म्हटलंय की, ६९० पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांच्या खर्चाचा तपशील अहवालात समाविष्ट केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना (उबाठा) यांनी निवडणूक लढवूनही शून्य खर्च दाखवला. अरुणाचल प्रदेशात एका पक्षाने, आंध्र प्रदेशात ७४, ओडिशात ३५ आणि सिक्कीममध्ये दोन पक्षांनी विधानसभा निवडणूक लढवली. एडीआरच्या विश्लेषणात या पक्षांच्या खर्चाचा तपशील समाविष्ट केलेला नाही.
दरम्यान, राजकीय पक्षांना निवडणूक खर्चाचा तपशील ९० दिवसांच्या आत द्यावा लागतो. परंतु अनेक पक्षांनी खर्चाचा तपशील आयोगाला उशिरा सादर केला. ‘आप’ने १६८ दिवसांनंतर आपला अहवाल सादर केला. तर भाजपने १५४ दिवसांत आपला अहवाल सादर केला. फक्त काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेचा तपशील वेळेवर सादर केला.