2014 मध्ये 41, यंदा फक्त 6 ‘भिडू’ देताहेत PM मोदींना टक्कर; उमेदवारांची प्रोफाइलही खास..

2014 मध्ये 41, यंदा फक्त 6 ‘भिडू’ देताहेत PM मोदींना टक्कर; उमेदवारांची प्रोफाइलही खास..

Varanasi Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत सहा टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. आता 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यादिवशी 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होतील. सुरत मतदारसंघातील निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. निकाल लागल्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने जिंकणाऱ्या उमेदवारांची चर्चा तर होईलच याच बरोबर अतिशय कमी मतांनी पराभूत होणाऱ्यांची सुद्धा चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही.

उत्तर प्रदेशातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ वाराणसी. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवले आहे. तसेच आणखी पाच उमेदवार रिंगणात आहेत. बहुजन समाज पार्टीने अतहर जमाल लारी यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात मोदींची चर्चा होईलच शिवाय त्यांना टक्कर देणार उमेदवार कोण होते याचीही चर्चा होईल.

सन 2014 मधील निवडणुकीत पीएम मोदींच्या विरोधात तब्बल 41 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 19 अपक्ष होते. 2019 मधील निवडणुकीत 26 उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यापैकी 8 अपक्ष उमेदवार होते. आताच्या निवडणुकीत सुरुवातीला 41 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नंतर यातील एका जणाने माघार घेतली. यानंतर उमेदवारी अर्ज छाननीतून सात उमेदवार पुढे जाण्यात यशस्वी ठरले. आता हे सहा उमेदवार कोण आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देत आहेत याची माहिती घेऊया..

प्रचाराची धामधूम शांत होताच मोदींचा पुढचा प्लॅन ठरला; कन्याकुमारीत करणार ध्यान

काँग्रेसकडून अजय राय पुन्हा मैदानात

अजय राय काँग्रेसमधील दिग्गज नेते आहेत. मागील निवडणूकही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढली होती. 2009, 2014 आणि 2019 या तीन निवडणुका त्यांनी वाराणसी मतदारसंघातून लढल्या. मात्र या सगळ्याच निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तरी देखील काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राय यांच्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्याकडे चल संपत्ती 6.66 कोटी आणि 1.25 कोटींची अचल संपत्ती आहे. अजय राय पाच वेळेस आमदार राहिले आहेत. कोलासला मतदारसंघात तर तीन वेळेस भाजपनेच त्यांना तिकीट दिले होते. 2012 ते 2017 या पाच वर्षांच्या काळात अजय राय पिंडरा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.

जनता पार्टी,  अपना दल आता ‘लारी’ बसपाचे उमेदवार

बहुजन समाज पार्टीने अतहर जमाल लारी यांना तिकीट दिले आहे. सन 1977 मध्ये जनता पार्टी अस्तित्वात आल्यानंतर लारी त्या पक्षात सहभागी झाले. पक्षात अनेक पदांवर काम केले. 1984 मध्ये लारी यांनी जनता पार्टीच्या तिकिटावर वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढली मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1991 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीतही नशीब आजमावले.

जनता पार्टीच्या विघटनानंतर लारी 1995 मध्ये सोने लाल पटेल यांच्या नेतृत्वात अपना दल या पक्षात सहभागी झाले. 2004 क्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाने त्यांना तिकीट दिले. या निवडणुकीत लारी वाराणसीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2012 मध्ये त्यांनी मुख्तार अन्सारीच्य कौमी एकता दल पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढली. 2022 मधील निवडणुकीत त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला होता. निवडणुकीनंतर त्यांनी बसपात प्रवेश केला.

काँग्रेसची पिछेहाट अन् भाजपनं साधला डाव; दहा वर्षांच्या पॉलिटिक्सनं BJD ला ‘धडकी’

गोशाळेचे मालक शिवकुमार

हैदराबाद येथील रहिवासी शिवकुमार तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे माजी सदस्य आहेत. हैदराबाद मध्ये त्यांच्या तीन गोशाळा आहेत. या गोशाळांमध्ये दीड हजार गायींना आश्रय दिला आहे. त्यांची अशी मागणी आहे की केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे. भाजप सनातन धर्माबद्दल फक्त बोलतो पण काहीच करत नाही अशी त्यांची तक्रार आहे.

समाजवादी सोडली अन् यादवांना उमेदवारी मिळाली

आमदार पल्लवी पटेल यांच्या अपना दलाने गगन यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देत अपना दलात प्रवेश केला आहे. वाराणसी पासून चार किलोमीटर अंतरावरील भट्टी या गावातील ते रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीत यादव पहिल्यांदाच उमेदवारी करत आहेत. 39 वर्षीय दिनेश कुमार यादव अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिनेश यादव मागील पंधरा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.

सामाजिक काम पण मोदींवर टीका, तिवारी अपक्ष उमेदवार 

राजधानी दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार तिवारी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मी पंतप्रधान मोदींचा टीकाकार आहे म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे तिवारी यांनी सांगितले. मोदी यांच्या धोरणांवर संजय कुमार सातत्याने टीका करत असतात. आता अपक्ष म्हणून त्यांनी रिंगणात उडी घेतली आहे.

अरविंद केजरीवालही झाले होते पराभूत

मागील दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. 2014 मध्ये मोदींनी आम् आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 3 लाख 72 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. 2019 मधील निवडणुकीत मोदींनी पुन्हा विजय मिळवला त्यावेळी त्यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होऊन एकूण मते 4.59 लाख इतकी झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज