“इतिहासातून पाकिस्तानने धडा घेतला नाही आता आम्ही..” PM मोदींचा पाकिस्तानला कठोर इशारा

“इतिहासातून पाकिस्तानने धडा घेतला नाही आता आम्ही..” PM मोदींचा पाकिस्तानला कठोर इशारा

PM Narendra Modi on Kargil Vijay Diwas : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिलला (Kargil Vijay Diwas) भेट दिली. येथील द्रास येथून शेजारी देश पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. कारगिलमध्ये आपण फक्त युद्धच जिंकलो नाही. सत्य, संयम आणि सामर्थ्याचाही परिचय दिला. भारताने त्यावेळीही शांततेचा मार्ग सोडलेला नव्हता. शांती प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून वारंवार प्रयत्न केले जात होते. मात्र पाकिस्तानने पुन्हा त्याचा विश्वासघाती चेहरा दाखवला. पण, तरीही सत्यासमोर असत्य आणि दहशतवादाचा पराभव झाला अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला फटकारले.

पाकिस्तानने इतिहासात भारतावर विजय मिळवण्याचे जितके प्रयत्न केले ते सगळे धुळीस मिळाले. तरीही पाकिस्तानने या पराभवांतून काहीच धडा घेतला नाही. दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉरच्या मदतीने आपले अस्तित्व दाखवून देण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे. पण आज मी ज्या जागेवरून बोलत आहे तेथून दहशतवादाच्या पुरस्कर्त्याला हा आवाज ऐकू जात आहे. मी या दहशतवादाला पोसणाऱ्यांना (पाकिस्तान) स्पष्ट शब्दांत इशारा देत आहे की त्यांचे मनसूबे कधीच यशस्वी होणार नाहीत.

चंद्राबाबू अन् नितीशकुमारांनी दाखवली पॉवर : आंध्र अन् बिहारसाठी मोदींनी खोलली तिजोरी

भारताच्या शत्रू्ंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. लडाख (Ladakh) असो की जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) या राज्यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात नक्कीच करू. येत्या 5 ऑगस्ट रोजी कलम 370 रद्द (Article 370) करण्याच्या निर्णयाला पाच वर्षे पूर्ण होतील. आज जम्मू काश्मीर विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे चालला आहे. काश्मीर लेह आणि लडाख या भागात पर्यटनाच्या क्षेत्रात वेगाने विकास होत असल्याचे मोदी म्हणाले.

पीएम मोदींनी लडाखमधील द्रास भागाचा दौरा केला. येथील कारगिल वॉर मेमोरियलला भेट दिली. द्रास कारगिल जिल्ह्यात आहे. लडाखचे प्रवेश द्वार म्हणूनही द्रास ओळखला जातो. येथे कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतय सैन्यातील जवानांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदींच्या आधी भारतीय लष्करप्रमुखांनी शहीदांनी श्रद्धांजली अर्पित केली होती.

अग्निपथवरून विरोधकांना मोदींचे फटकारे

यानंतर मोदींनी अग्निपथ योजनेवरून विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. मोदी म्हणाले, खरंतर अग्निपथ योजनेने देशाच्या ताकदीत वाढच होणार आहे. देशातील सामर्थ्यवान युवक देशसेवेसाठी पुढे येतील. मला आश्चर्य वाटतं की काही लोकांना नेमकं काय झालंय. त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला काय झालंय. सरकारने पेन्शनच्या पैशांची बचत करण्यासाठी अग्निपथ योजना सुरू केली अशी दिशाभूल करणारी आणि संभ्रम निर्माण करणारी चुकीची माहिती विरोधकांकडून दिली जात आहे. अशा लोकांची लाज वाटते पण तरीही मला या लोकांना विचारायचंय की आताच्या सरकारच्या काळात जो भरती होईल त्याला काय आजच पेन्शन दिली जाणार आहे का?

त्याला पेन्शन देण्याची वेळ तीस वर्षांनंतर येईल पण त्यावेळी मोदी तर 105 वर्षांचा झालेला असेल. तुम्ही (विरोधक) काय बोलत आहात? माझ्यासाठी पक्ष नाही तर देश सर्वोच्च आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी काम करतोय असे मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube