तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा…शिरसाट अजितदादांच्या खात्यावर चिडले !

Sanjay Shirsat On Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचारात जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिलं होतं. नुकताच लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या खात्यातील निधी या योजनेकडे वर्ग केल्याचं समोर आलाय. तर दुसरीकडे सामाजिक न्याय खात्याचा निधी निधी कपात करून तो लाडक्या बहिणी योजनेकडे वळवल्याचा आरोप होत आहे. निधी वाटपावरून सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिली. जर मला पूर्ण निधी नाही मिळाला तर सामाजिक न्याय विभाग चालवणे अवघड होईल असं म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार हे निधी देत नसल्याच्या कारणावरून तुम्ही तक्रार करत होता. परंतु आता महायुतीत सुद्धा हेच चित्र दिसत आहे. त्यामुळे अजित पवार हे मुद्दाहून करतात का? असा प्रश्न शिरसाठ यांना विचारला असता, ते मुद्दामहून करत असतील. असं मला वाटत नाही. परंतु जे त्यांना अधिकारी ब्रिफिंग देतात…. माहिती देतात ती चुकीचे देत असावी. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. माझा कुठल्याही योजनेला विरोध नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली होती. आणि या योजनेमुळे अनेक लाडक्या बहिणींना फायदा होत आहे. परंतु सामाजिक न्याय खात्यातील निधी कपात करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे वित्त विभागाकडून किंवा अर्थ खात्याकडून असे का होत आहे, यातला झारीतील शुक्राचार्य कोण आहे? हे मला माहित नाही. परंतु यावर महायुतीतील आमचे तिन्ही नेते बसून यावर तोडगा काढतील, असे मला वाटते. याबाबत मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून याची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे.
भारताच्या हल्ल्यापूर्वीच निसर्गाचा पाकिस्तानला ‘दे धक्का’; 4.2 रिश्टर स्केल भूकंपानं जमीन हादरली
खाते चालविणे अवघड होईल…
राज्याचे बजेट अडीच लाख कोटींचे आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाला 29 हजार 500 कोटीचा निधीचा तरतूद हवी होती. यानुसार 11.8% नुसार निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र तेवढा निधी मिळाला नाही. केवळ 22 हजार 658 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी 6,765 कोटीचा निधी इतर विभागासाठी राखीव ठेवण्यात आलाय. तर 3960 कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलाय. 1485 कोटी घरकुल योजनेसाठी तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलतसाठी 1320 कोटी रुपये देण्यात आलेत. त्यामुळे मूळ विभागासाठी 15893 कोटीचे तरतूद करण्यात आली आहे. जर शंभर टक्के आमच्या विभागाला निधी दिला तर आम्ही आमच्या विभागाला न्याय देऊ, एकदाच सुरुवातीला संपूर्ण निधी द्या, तो हवेतर नंतर त्यातून कपात करा, पण मुळातच निधी कपात करायची. परिणामी खाते चालवणे अवघड होऊन बसले आहे, असं म्हणत पुन्हा एकदा संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या विभागाची कामगिरी चांगली नसेल तर माझी मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, असे संजय शिरसाट म्हणाले.
अर्थ खात्याकडून शिंदे गटाच्या मंत्र्यांना डावललं जातंय. किंवा निधी कमी दिला जातोय. अजित पवार हे मुद्दामून असं करतात का? असा प्रश्न संजय शिरसाठांना विचारला असता, मी यापूर्वीही याबाबत बोललो आहे. सांगितला आहे. परंतु मी बोलल्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना विचारणार त्यामुळे आमचा महायुतीत समन्वय आहे. कुठेही अलबेला नाही, मतभेद नाहीत… उगाच माध्यमांनी आमच्यात भांडणं लावू नये, असं यावेळी संजय शिरसाठ म्हणाले. अर्थखात्याकडून शिंदे गटातील मंत्र्यांना निधीमध्ये डावललं जातंय, त्यामुळे शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्थ खात्यामध्ये काही महाभाग बसले आहेत, जे शकुनी लोकं आहेत, असा टोला यापूर्वी संजय शिरसाट यांनी लगावला होता.