सामना गमावला दंडही बसला, इंग्लंड टीमचं मोठं नुकसान; ‘या’ कारणामुळे ICC कडून कारवाई

England Team Fined for Slow Over Rate : इंग्लंड क्रिकेट संघावर आयसीसीने (England Team) मोठी कारवाई केली आहे. या संघावर दंड ठोठावण्यात आला आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने (IND vs ENG) इंग्लंडचा 97 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार स्मृती मंधानाने 112 धावांची खेळी केली होती. इंग्लंड संघावर हा दंड स्लो ओव्हर रेटच्या कारणामुळे आकारण्यात आला आहे.
याबाबत आयसीसीने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की इंग्लंडने ठरवून दिलेल्या वेळेत दोन ओव्हर कमी (Slow Over Rate) टाकल्याचे सामनाधिकाऱ्यांच्या पॅनलच्या लक्षात आलं. आयसीसीची नियमावलीमधील आर्टिकल 2.2 अंतर्गत हा दंड ठोठावण्यात आला आहे. या आर्टिकलमध्ये ओव्हर रेटशी संबंधित प्रकरणी कारवाई करता येते.
गोलंदाजी करणारी टीम निर्धारीत वेळेत संपूर्ण ओव्हर टाकू शकली नाही तर वेळेनंतर टाकल्या गेलेल्या प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 5 टक्के दंड भरावा लागतो. अशा पद्धतीने इंग्लंड संघावर एकूण 10 टक्के दंड आकारण्यात आला आहे. सामन्यातील पंचांनी स्लो ओव्हर रेटचा मुद्दा उपस्थित केला होता. इंग्लंड संघाची कर्णधार नॅट साइवर ब्रंटने या आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे यापुढे अन्य कारवाईची गरज पडली नाही.
इंग्लंडला पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने चारली धूळ; अंडर 19 टीम इंडियाचा मोठा विजय
टीम इंडियाचा दिमाखदार विजय
नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी दिमाखदार विजय संपादन केला. या सामन्यात टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा काही खास करू शकली नाही. तिला फक्त 20 धावा करता आल्या. परंतु, कर्णधार स्मृती मंधानाने जबरदस्त फलंदाजी करत 112 धावा केल्या. याच दरम्यान तिने महिला टी 20 क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात वेगवान शतक केले. तिने फक्त 51 चेंडूत शतक झळकावले. याव्यतिरिक्त हरलीन देओलने 43 धावा केल्या.
भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला (England Cricket Team) फार काही करता आलं नाही. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली त्यामुळे इंग्लंडचा संघ 113 धावांवर ऑलआउट झाला. भारताने हा सामना जिंकला. या विजयाबरोबर भारतीय संघाने इंग्लंविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
..तर सात दिवस खेळाडूला मैदानात NO ENTRY; क्रिकेटच्या नियमांत ICC कडून मोठा बदल