महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून पेच; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसावर होणाऱ्या (Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप कडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरनाईक म्हणाले, “विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.
यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील. तसंच, शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचं ठरवलं आहे. लोकसभा, विधानसभा आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने स्वतःची ताकद जास्त असतानाही नेहमीच कमी जागा घेऊन तडजोड केली.
ही तडजोडीची सल आजही पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा तोच प्रकार सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती.
महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालं असलं, तरी काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचं कळत आहे. मात्र, शिवसेनेने थेट 7 जागांची मागणी केल्यामुळे आता नेमकं कोण माघार घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग, हिंगोली – परभणी
शिवसेना – ठाणे, नाशिक, यवतमाळ,
भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर
निवडणूक कार्यक्रम जाहीर
अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून