भारतीयांना व्हिएतनामची भुरळ! 5 कारणे माहिती करुन घ्या अन् व्हिएतनाम गाठाच..

भारतीयांना व्हिएतनामची भुरळ! 5 कारणे माहिती करुन घ्या अन् व्हिएतनाम गाठाच..

Vietnam News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) यांनी नुकताच व्हिएतनाम देशाचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी सवाल करत जोरदार टीका केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी लगेचच व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले होते असा आरोप भाजप नेत्यांनी केला. राहुल गांधी यांच्या दौऱ्याने व्हिएतनाम हा देश भारतीय राजकारणात चर्चेत आला आहे. चला तर मग आज याच निमित्ताने भारत आज व्हिएतनाम या दोन देशांतील संबंध कसे आहेत? भारतीय लोकांना व्हिएतनाम अखेर इतका का आकर्षित करतो? याची माहिती घेऊ या..

व्हिएतनाम अतिशय सुंदर देश आहे. या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सांस्कृतिक वारसा आहे. यामुळे जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी व्हिएतनामला पसंती देतात. व्हिएतनामचा व्हिसा देखील सहज उपलब्ध होतो. व्हिसासाठी ऑनलाइन प्रक्रिया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे पोहोचल्यानंतर भारतीय व्यक्ती स्वतः ला मोठा माणूस समजू शकतो. कारण एक भारतीय रुपया जवळपास तीनशे व्हिएतनामी डोंग बरोबर आहे. यामुळे भारतीयांसाठी व्हिएतनाममध्ये राहणे खूप स्वस्त आहे.

सन 2023 मध्ये जवळपास अडीच लाख आणि 2024 मध्ये तब्बल पाच लाख भारतीयांनी व्हिएतनामला भेट दिली होती. सन 2022 पासून दोन्ही देशांतील लोकांचा प्रवास वाढला आहे.

INS Kirpan: चीनचा करेक्ट कार्यक्रम, भारतीय नौदलाची INS कृपन व्हिएतनामला भेट

गुंतवणूक आणि व्यापार

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार भारताने 350 पेक्षा जास्त प्रकल्पांत गुंतवणूक केली आहे. ऊर्जा, खनिज, कॉफी, चहा, साखर, आयटी, फार्मा या क्षेत्रांतील हे प्रोजेक्ट आहेत. व्यापाराच्या बाबतीत व्हिएतनामने भारताला अनेक सवलती देखील दिल्या आहेत. व्यापार आणि उद्योगात भारताचा वाटा वाढला तर प्रवास देखील वाढणारच आहे. आगामी काळात भारताची गुंतवणूक अधिक वाढण्याची शक्यता आहे. ओएनजीसी विदेश लिमिटेड, एचसीएल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांसारखे अनेक भारतीय कार्यालय व्हिएतनामधून संचालित होत आहेत.

शिक्षण आणि रोजगाराच्या संधी

आजमितीस व्हिएतनाम मध्ये 240 विद्यापीठ आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक स्कॉलरशीप येथे उपलब्ध आहेत. एमबीबीएस आणि अन्य अभ्यासक्रमासाठी भारतीय विद्यार्थी या देशात मोठ्या संख्येने येत असतात. दुसरे म्हणजे व्हिएतनाममध्ये रोजगाराच्या संधी चांगल्या आहेत. आयटी, इन्फ्रा, फार्मा यांसारख्या क्षेत्रात भारतीयांना चांगल्या संधी मिळत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात भारतीय या देशात येत आहेत.

सांस्कृतिक समानता

भारत आणि व्हिएतनाम या देशांत अनेक सांस्कृतिक समानता आहेत. या देशांत अनेक हिंदू मंदिरे आहेत. भारतीय या देशात येण्याचे हे देखील एक मोठे कारण आहे. खाण्यापिण्यासाठी येथे भारतीय रेस्टॉरंट सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय भोजनाची येथे काहीच अडचण नाही.

व्हिएतनाम सर्वात सुरक्षित देश

व्हिएतनाम सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो. येथील जनजीवन एकदम शांत आहे. गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच पर्यटकांसाठी व्हिएतनाम एक सुंदर डेस्टिनेशन आहे. नैसर्गिक संपन्नता, सुरक्षितता आणि किफायतशीर असा देश असेल तर याठिकाणी जाणे कुणाला आवडणार नाही? या कारणामुळे व्हिएतनाम भारतीयांसाठी सर्वाधिक पसंतीचे डेस्टिनेशन ठरू लागलं आहे.

चीनमध्ये 3.5 कोटी पुरुषांना मिळेना जीवनसाथी.. लग्नासाठी दुसऱ्या देशांकडे पळापळ

भारत आणि व्हिएतनामचे संबंध कसे आहेत

भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांतील संबंध अतिशय जुने आहेत. भारताने सुरुवातीच्या काळात येथे वाणिज्य दूतावास सुरू केला होता. परंतु सन 1972 मध्ये दोन्ही देशांचे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिएतनाम दौऱ्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले. व्यापार आणि रणनीतीक भागीदारी नंतर दोन्ही देशांतील व्यापार अडीच पट वाढला आहे.

सन 2023 – 24 या वर्षात दोन्ही देशांतील व्यापार 14.82 बिलियन डॉलर इतका होता. यात भारताने 5.47 बिलियन डॉलर किमतींच्या विविध वस्तूंची निर्यात केली होती. तर व्हिएतनामने भारताला 9.35 बिलियन डॉलर किमतीच्या विविध वस्तू पाठवल्या होत्या. या दोन्ही देशांत संरक्षण सहकार्य देखील वेगाने वाढत चालले आहे. व्हिएतनाममध्ये भारतीय योगाची वेगळीच क्रेझ आहे. यात भारतीय योग शिक्षकांची मोठी भूमिका आहे. भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवान व्हिएतनाम मध्ये जाऊन संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देतात. येथे युद्ध सरावात भाग घेत असतात. दरवर्षी 150 व्हिएतनामी नागरिक भारतात येतात आणि येथे विविध प्रकारचे प्रशिक्षण तसेच शैक्षणिक कार्यक्रमांत भाग घेतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube