८५ चा फॉर्मुला अंतिम नाही; काँग्रेस १०० जागा लढवणार; वडेट्टीवारांचा दावा, काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

  • Written By: Published:
८५ चा फॉर्मुला अंतिम नाही; काँग्रेस १०० जागा लढवणार; वडेट्टीवारांचा दावा, काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

Maharashtra Congress :  राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज पुन्हा दिल्लीला जात आहेत. त्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस १०० जागा लढवणार आहे असा दावा केला आहे. तसंच, ८५ ८५ असा फॉर्मुला ठरला असला तरी तो काही अंतिम फॉर्मुला नाही असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. तसंच, जागा वाटपात कांग्रेस १०० च्या पुढे जाईल का या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले शक्यता आहे. त्यामुळे आज काँग्रेस दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ८५ जागांचं सूत्र मांडण्यात आल्याचं सांगून २७० जागांवर सहमती झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र २५५ जागांच्या सूत्रात उरलेल्या १५ जागांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या १५ जागांची तिन्ही पक्षांमध्ये अदलाबदली केली जाईल, अशी माहिती दिली. पण त्याचबरोबर त्यांनी १५ पैकी बहुतांश जागा काँग्रेसकडे येतील, असे विधान केले.

माहीम विधानसभा राज साहेबांना भेट देणार; पहिल्याच प्रचार सभेत अमित ठाकरे जोरदार भाषण

काँग्रेसचा एकूण जागांचा आकडा १०० ते १०५ च्या दरम्यान असेल. मात्र, मुळात जागावाटप करताना कुणाला किती जागा असा विचार न करता गुणवत्तेच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय घेतला आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच, महाविकास आघाडीमध्ये काही तणाव नाही. सर्वांना आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये काही गैर नाही असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

हे सगळ असंताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसचा १०० जागांचा दावा सपशेल फेटाळून लावला. आता फार घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी काही मतदारसंघांत बदल होतील, उमेदवार बदलले जातील त्याविषयी चर्चा सुरू आहे. पण यापलीकडे काही घडणार नाही. जागावाटपाचा ८५-८५-८५चे सूत्र कायम राहील असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube