जयंत पाटलांचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रमेना? अयोध्या व्हाया भाजप नवा मार्ग

जयंत पाटलांचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रमेना? अयोध्या व्हाया भाजप नवा मार्ग

Jayant Patil : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या (Ayodhya Ram Mandir) मुर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण त्यांच वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना अयोध्या प्रेमाचे भरते आलंय. यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगलीय. खुद्द जयंत पाटील यांनी अनेक वेळा याचा इन्कार केलाय पण तरीही सातत्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची का चर्चा होते? खरंच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटल्याप्रमाणे जयंत पाटील यांच्यामुळे महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार रखडालाय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जयंत पाटील बनले नंबर 1
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर आमदार जयंत पाटील यांना शरद पवार गटात राज्यातील एक नंबरचे स्थान मिळाले आहे. पण तरी जयंत पाटील समाधानी आहेत असे सध्या तरी दिसत नाही.

जयंत पाटलांना सतत्याने डावलले
महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यापूर्वी अजितदादांनी पहाटेचा शपथविधी करून राष्ट्रवादीतून बाजूला जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, राजकारणातील चाणक्य समजले जाणाऱ्या शरद पवार यांनी पक्षावर झालेला राजकीय हल्ला परतवून लावला. महाविकास आघाडीचे सरकार आणले. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडून आपलेच नाव पुढे केले जाईल असे वाटत असताना अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा जयंत पाटलांना होती पण तेथेही अजितदादांनीच बाजी मारली. यामुळे आमदार जयंत पाटील कितीही सांगत असले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती.

ऑफर असताना धाडस केले नाही
महाविकास आघाडीचे सरकार असताना जयंत पाटलांना भाजपकडून 15 आमदारांसोबत घेऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर होती. मात्र, त्यांनी धाडस केले नाही, की त्यांना 15 आमदारांचा गट बाहेर काढणे शक्य झाले नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय बंद मुठीतच राहिला असल्याची चर्चा भाजप गोटात होत असते. अजितदादांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रीपद आणि जलसंपदा खातेही राखीव ठेवण्यात आल्याची आजही चर्चा आहे.

संजय शिरसाट यांनी फोडला बॉम्ब
हीच चर्चा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी बोलून दाखवत आमदार जयंत पाटील मनाने सत्तेसोबत असल्याचे सांगत गुगली टाकली. यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबलेला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. आमदार जयंत पाटील यांनी तातडीने याचा इन्कार केला. आपण संजय शिरसाट यांना कधी भेटलोच नाही असे सांगत या वक्तव्याला अदखलपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला.

जयंत पाटलांना अयोध्येला जायचंय
इस्लामपूरमध्ये आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता कलशाचे स्वागत करण्यासाठी आमदार जयंत पाटील हे राजारामबापू कारखान्यावरील राममंदिरात उपस्थित होते. धार्मिक विधीमध्ये सहभागी होत आपले वडिल राजारामबापू यांच्या नावातच राम असल्याने आपण रामभक्त असल्याचे सांगितले. आपल्यालाही अयोध्येला जायचे आहे, मात्र, गर्दी कमी झाल्यावर आपण तेथे जाणार आहे असे सांगितले. राम कोणत्याही एका पक्षाचा नाही, सामान्य जनतेचा आदर्श पुरूष असल्याचे सांगत आपले पुरोगामीत्व दर्शविण्याचाही प्रयत्न केला.

‘राम शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दोन महत्वाचे मोहरे अजितदादाच्या गळाला
सध्या इस्लामपूरधील आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तिय समजले जाणारे दोन महत्वाचे मोहरे अजितदादाच्या गळाला लागले असल्याची चर्चा इस्लामपूरच्या चौका-चौकात आहे. गेली 40 वर्षे सोबत असलेले मोहरे जर दादासोबत जाणार असतील तर त्यांना यापासून रोखण्याचा डावही त्यांचा असू शकतो, अथवा सत्तेसोबत जायचे की विरोधात राहायचे याची अनिर्णित अवस्था असू शकतो.

काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा
सांगलीत बैठक घेउन दादा गटात जाण्याची मानसिकतेत असलेल्या माजी नगरसेवकांना रोखण्याचा प्रयत्न करीत असताना काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा जयंत पाटलांनी दिला. हातकणंगले लोकसभेसाठी पुत्र प्रतिक पाटील आणि सांगली लोकसभेसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नावाची शिफारस याच बैठकीत कार्यकर्त्यांनी केली होती.

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

विशाल पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न
सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा प्रबळ दावा आहे. इथून युवा नेते विशाल पाटील तयारी करीत आहेत. हे माहिती असतानाही शरद पवार गटाची नवीन भूमिका अचंबित करणारी तर आहेच, पण काँग्रेसच्या विशाल पाटलांना यांना शह देणारी आहे.

याच बरोबर माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अजितदादांची भेटही घेतली. या पार्श्‍वभूमीवर आमदार जयंत पाटील यांनी विजय बंगल्यावर चहापाणी घेतल्याने नव्या चर्चेला घुमारे फुटत आहेत. यामागे महापालिकेची मोर्चेबांधणी आहे की, लोकसभेसाठी दबाव तंत्र आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज