भुजबळांच्या बंडखोरीची वाट कोणत्या दिशेने; राऊतांनी मार्ग सांगत घेतले अजितदादा, तटकरे अन् पटेलांचं नाव

  • Written By: Published:
भुजबळांच्या बंडखोरीची वाट कोणत्या दिशेने; राऊतांनी मार्ग सांगत घेतले अजितदादा, तटकरे अन् पटेलांचं नाव

मुंबई : लोकसभा आणि राज्यसभेत छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) डावलण्यात आल्याने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. या चर्चांमध्येच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुजबळांच्या राजकीय प्रवासाबद्दल मोठं विधान करत जुनी खपली काढत दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On Chhagan Bhujbal Party Change)

‘समता’ च्या दबावातून भुजबळांचं प्रेशर पॉलिटिक्स; मंत्रिपदाचा राजीनामा की नुसतीच पोकळ हवा?

राऊत म्हणाले की, भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते, मोठे नेते होते. पण ते आता या पक्षात नाहीत. ते जर शिवनेसा (ठाकरे गट) किंवा कोणत्याही पक्षात टिकून राहिले असते तर, ते नक्कीच मुख्यमंत्री बनले असते असे म्हणत राऊतांनी लोकसभा आणि राज्यसभेत साईडलाईन झालेल्या भुजबळांच्या जुन्या जखमेवरची खपली काढली आहे. छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणीही भेटलेलं नाही, त्यांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पक्षाची विषयीची असल्याचेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?

भुजबळ ठाकरेंच्या पक्षात येणार ही अफवा कालपासून जोरात चाललेली आहे. मात्र, ते कोणत्या वाटेने येत आहेत ही वाट काय आम्हाला दिसलेली नाही. भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, त्याला एक कालखंड झाला आहे, जमाना झाला आहे. भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, शरद पवार यांच्या बरोबर ते राष्ट्रवादीत गेले, आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. पण त्यांच्या या प्रवासात शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे आणि महाराष्ट्रातील राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार या चर्चांमध्ये कोणतही तथ्य नसल्याचे राऊत म्हणाले.

रविंद्र वायकरांचा विजय हा एक आदर्श घोटाळा; अनेकांचं नावं घेत राऊतांची थेट चौकशीची मागणी

कोणताही राजकीय संवाद नाही

राऊत पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद नाही, चर्चा नाही, होण्याची शक्यता नाही. आता त्यांनी स्वतःचा मार्ग निवडलेला असून, त्यांची एक वेगळी भूमिका आहे, त्यांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका आता मेळ खाणार नाही. त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या गोंधळ उडवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून अशा बातम्यांना आम्ही अधिक महत्त्व देत नाही. त्यांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पक्षाची खदखद आहे, त्याच्याशी आमच्या शिवसेनेचा काय संबंध? त्यांनी त्यांची खदखद त्यांच्या पक्षांचे नेते अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर मांडली पाहिजे असा सल्लाही राऊतांनी भुजबळांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube