राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? CBSE अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंचे तीन सवाल..

Supriya Sule on CBSE Pattern : राज्य सरकारने राज्यांतील शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीच्या वर्गांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेतूनच उपलब्ध असतील. आता सरकारच्या या निर्णयावर राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारची कोंडी करणारा सवाल केला आहे. तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
राज्यातील शाळांत आता सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाणार आहे. यात मला सरकारला तीन प्रश्न विचारायचे आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमात किती टक्के मराठी आहे? यात महाराष्ट्राचा इतिहास असणार का? सीबीएसईतून शिक्षण दिल्यावर मराठी भाषेचं काय होणार? याची मला काळजी वाटते. तुम्ही (राज्य सरकार) राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का असे सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारले आहेत.
काल उपमुख्यमंत्री यांनी एक स्टेटमेंट केलं यामध्ये ते म्हणाले की सगळी सोंगे आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही त्यांच्या या वक्तव्याचे मी समर्थन करते. तुम्हाला फॉरेनच्या शाळा चालतात पण एसएससीच्या शाळा चालत नाहीत. महाराष्ट्रातल्या कविता महाराष्ट्रातले विचार सीबीएसई अभ्यासक्रमात असणार आहेत का याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले पाहीजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जयंत पाटील, अजितदादांच्या भेटीवर सुळे काय म्हणाल्या..
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. याबाबत पत्रकारांनी सुळे यांना विचारले असता वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये सर्व पक्षांची लोकं आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट ही त्याचसंदर्भात असेल. आमचं जे सोशल काम आहे ते वेगळं आहे आणि राजकारण हे वेगळ्या बाजूला आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जयंत पाटील अन् अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा, अर्ध्या तासात कोणती खलबतं?