लालू यादवांच्या स्वप्नांना सुरुंग : काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात, रात्रीत खेळ बिघडणार?

लालू यादवांच्या स्वप्नांना सुरुंग : काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात, रात्रीत खेळ बिघडणार?

पाटना : उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) महागठबंधन तोडून पुन्हा भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन्याच्या तयारीत आहे. एक ते दोन दिवसांत त्यांच्याच नेतृत्वात पण भाजपच्या पाठिंब्यावरील सरकारचा शपथविधी समारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या हालचाली लक्षात येताच राष्ट्रीय जनता दलाचे नेते (RJD) आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही मैदानात उतरत काँग्रेसच्या साथीने बहुमत जुळविण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांच्या याच हालचालींना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. (Bihar political crisis More than 10 Congress MLAs in touch with BJP)

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 19 पैकी दहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी हे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यापासून बहुमताचा आकडा लांब घेऊन जाण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या घडामोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लालू प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेल्या माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या भेटीसाठी भाजपने यापूर्वीच केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांना त्यांचे सहयोगी बिहारमध्ये पाठवले आहे.

लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

लालू प्रसाद यादव यांची हम पक्षाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर :

मिळालेल्या माहितीनुसार, यादव यांनी बहुमताची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली असून त्यांनी हिंदुस्तानी अवाम मोर्चाशी संपर्क साधला आहे. त्यांनी या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा मुलगा संतोष मांझी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. शिवाय महगठबंधनमध्ये आल्यानंतर लोकसभेच्या जागाही देण्याची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

243 सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 122 आहे. नितीशकुमार यांनी फारकत घेतल्यास लालू प्रसाद यादव यांच्या राजदला बहुमतासाठी आठ आमदार कमी पडत आहेत. सध्या विधानसभेत राजदचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या सर्वांचे मिळून 114 आमदार होतात. पण बहुमतासाठी लालू प्रसाद यादव यांना आणखी आठ आमदारांची गरज भासत आहे. त्यामुळेच त्यांनी हम पक्षाशी संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे.

नितीश कुमारांचं ठरलं! RJD ला धक्का देत ‘या’ दिवशी JDU-BJP सरकारचा शपथविधी ?

जीतनराम मांझी यांनी लालूप्रसाद यांची ऑफर नाकारली

दरम्यान, लालू प्रसाद यांनी संतोष मांझी यांना ऑफर दिली ही निव्वळ अफवा असल्याचे जीतनराम मांझी यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय त्यांनी आपण महागठबंधनसोबत जाणार नसल्याचे सांगितले आहे. मांझी यांच्या ‘हम’ पक्षाचे चार आमदार आहेत. दुसरीकडे भाजपचे 78 आमदार आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले तर त्यांचे 43 आणि एका अपक्ष आमदारासह एकूण 122 आमदार होत आहेत. मात्र, नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुनरागमन करण्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube