Jammu Kashmir : सुरुवातीच्या झटक्यांनंतर भाजप सुस्साट; काँग्रेसनी गमावली सुवर्णसंधी ?

Jammu Kashmir : सुरुवातीच्या झटक्यांनंतर भाजप सुस्साट; काँग्रेसनी गमावली सुवर्णसंधी ?

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक (Jammu Kashmir Election) सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या निवडणुकीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) या पक्षांची परीक्षा आहेच शिवाय भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय ताकदीची सुद्धा परीक्षा आहे. परिसीमन झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका (Elections 2024) होत आहेत. या कार्यवाहीनंतर जम्मू प्रांतात 43 आणि काश्मीरमध्ये 47 मतदारसंघ तयार झाले आहेत.

याआधी 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी जम्मू मध्ये 37 जागा होत्या यातील 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावरून लक्षात येते की जम्मूमध्ये भाजप (BJP) मजबूत स्थितीत आहे. या निवडणुकीत सुद्धा भाजपचा सर्वाधिक भर जम्मूवरच आहे. काश्मीर मध्ये भाजपने 47 पैकी फक्त 19 जागांवर उमेदवार दिले आहेत. जम्मूमध्ये जर आघाडी मिळाली तर राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरेल अशी अपेक्षा भाजप नेत्यांना आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात भाजप येथे कमजोर दिसत होता. प्रॉपर्टी टॅक्स आणि टोल प्लाझा या मुद्द्यांवर लोकांमध्ये नाराजीची भावना होती. 370 कलम  (Article 370) हटवण्यात आल्यानंतर मोठे फायदे होतील असे सांगण्यात आले होते. विशेष करून रोजगार आणि गुंतवणुकीत वाढ होईल असे सांगण्यात आले होते. परंतु तसे होताना काही दिसले नाही असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. तिकीट वाटपात सुद्धा भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. परंतु निवडणूक प्रचाराच्या (Election Campaign) सध्याच्या काळात असे दिसत आहे की जम्मूमध्ये काँग्रेस कमकुवत (Congress Party) होत चालली आहे तर भाजपने जोरदार प्रचार करत आपली स्थिती आणखी बळकट केली आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरनसमध्ये मैत्रीपूर्ण लढत

दोन्ही पक्षात आघाडी झाल्यानंतर काँग्रेसला ज्या 32 जागा मिळाल्या आहेत त्यातील 29 जागा जम्मूमध्ये आहेत. या जागांवर काँग्रेस निवडणूक लढत आहे. यातील चार जागा अशा आहेत जिथे नॅशनल कॉन्फरन्सचेही उमेदवार रिंगणात आहेत. काश्मीरमध्ये 9 जागा अशा आहेत जिथे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरनस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

उमेदवार निवडीत चूक

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या असे म्हणणे आहे की पक्षाने उमेदवारांची निवड करताना जातीगत समीकरणात गडडब झाली आहे. नंतर या चुका पक्षाच्या लक्षात आल्या. एमके भारद्वाज आणि भानू महाजन यांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी काश्मिरच्या तारिक अहमद कर्रा यांना देण्यात आली. जम्मूमधून ताराचंद आणि रमन भल्ला या दोघांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. अशा पद्धतीने पक्षाने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की काही मतदारसंघात अयोग्य उमेदवारांना तिकीट दिले. परिसिमन झाल्यानंतर श्री माता वैष्णोदेवी नवा मतदारसंघ तयार करण्यात आला. या मतदारसंघात भूपेंद्र जामवाल काँग्रेसचे उमेदवार आहेत. परंतु यामुळे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध…; PM मोदींचे जोरदार टीकास्त्र

काँग्रेसची प्रचारातही पिछाडी

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जम्मूतील 43 मतदारसंघ कव्हर करू शकले नाहीत असे स्थानिक नेते सांगत आहेत. दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांनी 30 पेक्षा जास्त रॅली काढल्या. राज्यात अजूनही निवडणुकीचा एक टप्पा बाकी आहे.

काँग्रेसला येथे जी आघाडी मिळण्याची शक्यता होती त्याचा फायदा नेत्यांना घेता आला नाही. प्रियांका गांधींच्या (Priyanka Gandhi) रॅलीची येथे जास्त मागणी आहे मात्र त्या प्रचार करतील की नाही याबाबत अद्याप ठोस काही दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुद्धा काँग्रेसच्या प्रचारावरून काळजीत पडले आहेत. अशी परिस्थिती असताना काँग्रेसच्या जम्मू काश्मीर प्रभारी भरत सिंह सोलंकी यांनी मात्र राज्यात पक्षाचा प्रचार चांगला सुरू असल्याचे म्हटले आहेत. प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळंच दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube