‘शिवसेना अन् राष्ट्रवादी आम्ही फोडले नाही तर’.. अमित शाहांनी शेवटी खरं ‘पॉलिटिक्स’ सांगितलंच
![‘शिवसेना अन् राष्ट्रवादी आम्ही फोडले नाही तर’.. अमित शाहांनी शेवटी खरं ‘पॉलिटिक्स’ सांगितलंच ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी आम्ही फोडले नाही तर’.. अमित शाहांनी शेवटी खरं ‘पॉलिटिक्स’ सांगितलंच](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/04/Amit-shah.jpg)
Amit Shah Comment on Shivsena-NCP Political Crisis : राज्यात सध्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधी मोठ्या घडामोडी घडल्या. आधी शिवसेना फुटली. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत (Ajit Pawar) बंड केले. अजितदादाही आज सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रिपदाचा कारभार पाहत आहेत. राज्यातील हे दोन मोठे पक्ष फोडण्यात भाजपाचा हात होत असा आरोप आजही केला जात आहे. विरोधक नेहमीच यावरून भाजपवर टीका करत असतात. आता याच आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे.
शाह म्हणाले, महाराष्ट्रात कोणताही पक्ष भाजपने फोडलेला नाही. खरंतर पुत्र आणि कन्येमुळे पक्ष फुटले. त्यामुळे भाजपने पक्ष फोडले या वक्तव्याशी मी सहमत नाही. मुलगी आणि पुत्रावरील प्रेमापोटी काही पक्षांमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांची इच्छा होती की आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं. या कारणामुळेच शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट बाहेर पडला. त्यांना आदित्य ठाकरेंचं नेतृत्व मान्य नव्हतं. पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांनी आधी उद्धव ठाकरेंना स्वीकारलं पण आता आदित्य ठाकरे यांचाही स्वीकार करावा का हे या लोकांना मान्य नव्हतं, असे शाह म्हणाले.
शरद पवार यांची (Sharad Pawar) देखील इच्छा होती की मुलीने पक्षाचा नेता व्हावं. मात्र पक्षातील अनेक नेते याला समर्थन देऊ शकत नव्हते. त्यामुळे भाजपने पक्ष फोडलेला नाही तर कन्या आणि पुत्र मोहापोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष (Shivsena) फुटले असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये दिलं.
Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’ अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील जागावाटप पूर्ण
यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. महाराष्ट्रातील जागांचं वाटप पूर्ण झालं आहे. आम्ही तिनही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, असे अमित शाह म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा सोडण्यात आल्या आणि उर्वरित मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार या प्रश्नांची उत्तरेही लवकरच मिळतील.