Amol Kolhe दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांकडून मोठी जबाबदारी!

Amol Kolhe दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर शरद पवारांकडून मोठी जबाबदारी!

Amol Kolhe News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Sharad pawar Group) घवघवीत यश मिळालंय. शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीत एकूण 10 जागा लढवण्यात आल्या होत्या. या 10 जागांपैकी शरद पवार गटाने 8 जागा जिंकल्या आहेत, तर साताऱ्याची जागा पिपाणी चिन्हामुळे गेली असल्याचा दावा करण्यात आलायं. उभ्या फुटीनंतरही राष्ट्रवादीच्या यशामध्ये आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी राज्यभर दौरा करत प्रचार केला. आता शरद पवार यांच्याकडून अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलीयं. अमोल कोल्हे यांची लोकसभेत प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आलीयं, अर्थातच कोल्हे यांचा व्हिप आता राष्ट्रवादीच्या खासदारांना लागू होणार आहे. यासंदर्भातील माहिती अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिलीयं.

अमोल कोल्हे पोस्टमध्ये म्हणाले, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले, असल्याचा उल्लेख अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये केला आहे.

तसेच ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानत असल्याचं अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

खासदार अमोल कोल्हे हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत पुन्हा लोकसभेत धडक घेतलीयं. लोकभेवर पहिल्यांदा निवडून आले त्यावेळी अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच दमदार भाषण केलं होतं. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. आता ते पुन्हा लोकसभेवर गेले असून त्यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आलीयं. त्यामुळे ते पुढील काळात कोणती उल्लेखनीय कामगिरीत करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज