सरकार मराठा बांधवाच्या भावनांशी क्रूर खेळ करतेय; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत आव्हाडांची सडकून टीका

  • Written By: Published:
सरकार मराठा बांधवाच्या भावनांशी क्रूर खेळ करतेय; ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत आव्हाडांची सडकून टीका

Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या सर्व्हेचा सावळा गोंधळ समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरू आहे, त्याबात काहीही माहिती नसलेल्या कर्मचाऱ्यावर सर्व्हेची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ ट्वीट करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारर टीका केली.

मराठा समाजाच्या फसवणुकीचं पाप ट्रिपल इंजिन सरकारचं; सर्व्हेच्या व्हिडिओवरुन सुळे संतापल्या… 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून राज्य सरकारवर टीका केली आहे. आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मराठा आरक्षणाचा सर्व्हे करणाऱ्या व्यक्तीला आपण काय काम करतो, हेच माहित नसल्याचं दिसतं. आव्हाड यांनी लिहिलं की, हे सरकार मराठा आरक्षणाबाबत खरेच गंभीर आहे का…? कर्मचार्‍यांना प्रशिक्षण नाही. सगळा फॉर्म डिजिटल असतांना त्याला मोबाईल वापरता येत नाही. सर्वे नेमका कशासाठी चाललं आहे, याचंच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही, असं आव्हाड म्हणाले.

नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक 

आव्हाड यांनी पुढं लिहिलं की, एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाटी रस्त्यावर उतरलेले असतांना ते मुंबईकडे कूच करत असतांना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षणाबाबत ते किती गंभीर आहे, हे लोकांच्या आता लक्षात येत आहे. आरक्षण देणार ते कसे देणार..? ओबीसीतून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार? इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार? या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही. उलट असे सर्व्हेचे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी हे सरकार क्रुर पद्धतीने खेळत आहे. आणि हा प्रकार आपल्या या राज्याच्या हिताचा नाही, हे मी निक्षूण सांगू इच्छितो, असं आव्हाडांनी लिहिलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. ते अवघ्या काही तासांत मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळं मनोज जरांगे काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube