“सुप्रिया दोन नंबर नाही एक, बरं एक तर एक पण, ‘तुतारी’ लक्षात ठेवा”; पवारांचा इंदापूरकरांना ‘मेसेज’

“सुप्रिया दोन नंबर नाही एक, बरं एक तर एक पण, ‘तुतारी’ लक्षात ठेवा”; पवारांचा इंदापूरकरांना ‘मेसेज’

Sharad Pawar : ‘या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती 98 टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे, असे शरद पवार म्हणताच, ‘साहेब एक नंबरला नाव आहे’, असा आवाज गर्दीतून आला. ‘चला एक नंबर तर एक नंबर. मला नंबर माहिती नाही. माझा नंबर खालून असायचा. असो, पण काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आज आपलं चिन्ह बदललं, ‘तुतारी’ लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा’, असे खास आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी इंदापूरकरांना केले.

पुण्यात भाजपला धक्का! माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय शरद पवार गटात

इंदापूर येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. पवार म्हणाले, आज 2024 वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही. सरकारने कांदा निर्यातंबदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला. कापूस उत्पादक हवालदिल झाला. पण सरकारला त्याची काहीच काळजी नाही.

आपण साखर निर्यात करतो. त्यातून दोन पैसे जास्त मिळतात. पण, केंद्राने सांगितलं की तुम्हाला साखर निर्यात करायची असेल तर आम्ही निर्यातीवर कर आणि जीएसटी लावू. त्याचा परिणाम असा झाला की आज कारखान्यात साखरेचे पोते पडून आहेत. यावर तोडगा म्हणून प्रधानमंत्र्यांनी इथेनॉल करायला सांगितले. कारखान्यांनी तयारही केले नंतर मात्र बंधन घातले. याचा मोठा फटका कारखान्यांना बसला यावरून दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आता चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

शरद पवार गटात धुसफूस? आमदार रोहित पवारांचं ट्विट तर तसेच संकेत देतंय..

विरोधकांवरील ईडी कारवाईवरून शरद पवार म्हणाले, सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहेत. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला. आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. केजरीवाल चमत्कारिक मुख्यमंत्री. त्यांनी लोकांसाठी अनेक चांगली कामे केली. आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत कशासाठी तर पंतप्रधानांवर टीका म्हणून. दिल्लीत केजरीवाल अतिशय लोकप्रिय आहेत. आज तेच तुरुंगात आहेत. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. आज संकटाचं चित्र देशात दिसत आहे. हे चित्र बदलायचं आहे. यासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची.

दिल्लीत शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले. पण मोदी सरकार त्यांच्याकडे पहायलाही तयार नाही.  काँग्रेसचे बँक खाते सुद्धा या लोकांनी गोठवले. व्यवहार बंद केला. उद्या तुमचंही खातं ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. यासाठी या लोकांचा पराभव करा. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube