अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? राणे म्हणतात, त्यांचा एखादा चुकीचा निर्णय…

अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? राणे म्हणतात, त्यांचा एखादा चुकीचा निर्णय…

Nitesh Rane on Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती असे म्हणत आपली चूक झाल्याचं मान्य केलं. अजितदादांच्या (Ajit Pawar) या कबुलीनाम्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. तसेच अजित पवार महायुतीला धक्का तर देणार नाहीत ना अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. यावर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा एखादा निर्णय चुकीचा असेल तर याचा अर्थ असा होत नाही की अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील. आज ते खूप पुढे निघून गेले आहेत. आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मला वाटतं अजित पवार एक मजबूत नेते आहेत महायुतीबद्दल ते असा विचार कधी करणार नाहीत.

 मस्ती कराल, तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू.. नितेश राणेंची पोलिसांना धमकी

एखादा निर्णय चुकीचा ठरत असला तरी ते महायुतीत मजबुतीने उभे आहेत आणि ऑक्टोबरमध्ये आमचं सरकार पु्न्हा घेऊन येणार आहेत. अजित पवार अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवाने त्यांनी हे मत व्यक्त केले असेल त्यामुळे महायुतीवर काही परिणाम होणार होईल असे इमले बांधणे चुकीचे आहे. एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर पडतील असे काही नाही, असे नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे पॅकअप करून लंडनला पाठवा

यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघाती टीका केली. राणे म्हणाले, महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांना आता पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ऑक्टोबरनंतर राज्याला लागलेली ही कीड कायमस्वरूपी काढून महाष्ट्र स्वच्छ करणार आहोत असा खोचक टोला राणेंनी लगावला.

जरांगेंनी राजकीय भाष्य टाळावं

मनोज जरांगे यांची (Manoj Jarange) राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी राजकीय भाष्य टाळणं त्यांच्यासाठी चांगलं आहे. जरांगे मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) जितकं बोलतील तेवढं त्यांच्या हिताचं आहे. सर्वच नेत्यांची स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमिकी जाहीर करावी. मनोज जरांगे यांच्या राजकारणामुळे मराठा समाजाचं नुकसान होईल तर मराठा समाज नक्कीच यावर भूमिका घेईल असेही राणे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube