आम्ही काय करायचं ते तुम्ही नका सांगू; बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भिडले
या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केलं आहे. आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करत आहोत असंही संदीप क्षीरसागर म्हणाले.
बीड जिल्ह्यातील दोन आमदार पंडित आणि क्षीरसागर (Beed) यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचं मला निमंत्रण नाही याबद्दल मी हक्क भंग दाखल करू शकतो असं नमूद केलं आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
आमदार विजयसिंह पंडित यांचं बीडवरती खूप प्रेम उतु चाललं आहे असं दाखवतात. मात्र, बीडमधले उद्योग गेवराईला नेत आहेत. बीड MIDC, रेशीम उद्योग हे गेवराईला नेत आहेत असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
अजितदादा असताना विमानतळासाठी मांजरसुंब्याचा पण सर्वे करा असं मी म्हणालो होतो. बॅक वॉटर योजनेसाठी आम्ही सर्वच स्तरावर पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित दादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. नगरपालिका निवडणुकीत जे काय केलं आहे ते अजित दादांनी केलं आहे असंही ते म्हणाले.
अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; पीए अमृत डावखर यांचा खळबळजनक दावा
विकास काम असो की भावनेचा विषय. आम्ही अर्ध्या रस्त्यातून, चौकातून पळून जात नाही असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी विजयसिंह पंडित यांचा डिवचलं आहे. बीडवर प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका, या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केलं आहे. आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करत आहोत असंही संदीप क्षीरसागर म्हणाले.
बीड नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. तेव्हापासून पंडित हे बीडच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर ते बैठका देखील घेत असल्याचे यापूर्वी दिसले होते. दरम्यानच्या काळात संदिप क्षीरसागर यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु वारंवार अशा पद्धतीने बैठका घेतल्या जात असल्याने यावर क्षीरसागरांनी थेट प्रशासनाकडे आक्षेप नोंदवला. सोमवार दि.11 रोजी बीड व गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत केली होती.
योग्य तो निर्णय मोठे साहेब करतील
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो असं सुनील तटकरे सांगत आहेत. याबद्दल संदीप क्षीरसागर यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्या बाबतीत मला काही माहित नाही. मात्र अजित दादांची शेवटची भेट झाली तेव्हा, ते मला म्हणाले होते आपण एकत्र येणार आहोत. पण त्यावर एवढं काही राजकारण सुरू आहे, त्यामुळे मी त्यावर काहीच बोललो नाही. योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचा परिवार ते करतील असंही क्षीरसागर म्हणाले.