एकेकाळी आपला वरचष्मा कायम ठेवणऱ्या काँग्रेसची अवस्था कठीण; विधान परिषदेतून मराठवाड्यात एकही आमदार नाही
आठ जिल्ह्यांच्या या विभागातील काँग्रेस पक्षाचा एकही प्रतिनिधी आता विधान परिषदेमध्ये राहिलेला नाही.
मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष अक्षरशः हद्दपार (Congress) झाला की काय अशी परिस्थिती समोर दिस आहेत. ७८ सदस्यसंख्या असलेल्या राज्य विधान परिषदेत एकाचवेळी १७ नव्या सदस्यांची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यामध्ये काँग्रेसची साधी चर्चाही झाली नाही. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाल. विधान परिषदेत १७ नवे सदस्य दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व सदस्य महायुतीचे असून भाजपा व अन्य मित्रपक्षांचे सभागृहातील बहुमत अधिक भक्कम झालं आहे.
यानिमित्ताने मराठवाडा विभागाचा विचार करायचा झाला, तर राज्य स्थापनेनंतर प्रथमच असं चित्र निर्माण झाले आहे की, आठ जिल्ह्यांच्या या विभागातील काँग्रेस पक्षाचा एकही प्रतिनिधी आता विधान परिषदेमध्ये राहिलेला नाही. एकेकाळी मराठवाड्यात या मतदारसंघावर आपला वरचष्मा राखणाऱ्या काँग्रेस पक्षाला मराठवाड्यात चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघात उमेदवार देता आला. त्या उमेदवाराचाही दारुण पराभव झाला.
मागील काळात मराठवाड्यातून शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम, ईश्वरराव भोसीकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, रजनीताई सातव मग लातूरचे दिलीपराव देशमुख या दिग्गजांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी विधान परिषदेमध्ये स्थान प्राप्त केलं. राज्य विधानसभेत मराठवाड्यातून काँग्रेसतर्फे अमित देशमुख हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. काँग्रेसची अशी दयनीय अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. गतवर्षाच्या अखेर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाला सर्वच जिल्ह्यामध्ये मोठा दणका बसल्यामुळे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात या पक्षाला कुठंही यश मिळू शकलं नाही.
शिवसेना मराठवाड्यात कमकुवत का होत गेली?, चौकाचौकात झेंडे दिसणाऱ्या पक्षाला का नाकारलं?
२०२४ची लोकसभा निवडणूक झाल्यावर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेतील काही जागांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसने आपल्या वाट्यास येणारी एकमेव जागा माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उदारपणे बहाल केली होती. पण या बाईंनी दीड वर्षांत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्या भाजपाकडून पुन्हा परिषदेमध्ये आल्या. मधल्या काळात जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे राजेश राठोड यांचीही मुदत संपली. आता विधान परिषदेवर मराठवाड्यातून काँग्रेसतर्फे कोणीही नाही.
काँग्रेसच्या मित्रपक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा मराठवाड्यातील एकही कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये नाही. ठाकरे गटातर्फे अलीकडे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. महायुतीच्या विरोधातील पक्षांचे ते मराठवाड्यातील एकमेव प्रतिनिधी आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सतीश चव्हाण व विक्रम काळे हे दोघे विधान परिषदेत अनुक्रमे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.