उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना खास आवाहन; थेट मनसेचा उल्लेख करत म्हणाले, 5 जुलैला याच!

उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना खास आवाहन; थेट मनसेचा उल्लेख करत म्हणाले, 5 जुलैला याच!

Uddhav Thackeray News : राज्य सरकारने आज (रविवार) हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत (Hindi Language Row) या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना (MNS Chief Raj Thackeray) नवं आवाहन केलं. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला. जीआर कोणी काढला होता. मागे हरिश्चंद्राची फॅक्ट्री पिक्चर आला होता. तसा भाजप खोट्याची फॅक्ट्री झाली आहे. अफवांची फॅक्ट्री झाली आहे. अफवा पसरवायच्या, खोटंनाटं कथानक तयार करायचं आणि मते मिळवायची हा भाजपचा धंदा झाला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.

तसंच, 5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत. यावेळी सर्वच पक्षांनी या विजयी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन केले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही विजयी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केलं.

हिंदी सक्तीचे निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एकजुटीचा धसका..”

मराठी माणसाला आवाहन आहे की संकटाची वाट पाहू नका. ही जाग कायम ठेवा. त्याचबरोबर आता सरकारने हिंदी सक्तीबाबत कोणतीही समिती नेमली तरी त्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही. सक्ती संपली. कुणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. सक्ती होऊ देणार नाही.

युतीबाबत माझी राज ठाकरेंशी प्रत्यक्ष नाही पण चर्चा सुरू आहे. आमचे नेते एकमेकांशी बोलत आहेत. पण माझी मनसे आणि सर्वांना विनंती आहे की 5 तारखेचा कार्यक्रम झाला पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देणार का? मनसे मोर्चात सहभागी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्रिभाषा सूत्राचे शासन निर्णय रद्द

हिंदी भाषा सक्तीला राज्यभरातून विरोध होत असतानाच महायुती सरकारने हिंदी भाषेबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीतील पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्राबाबत माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव (GR) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील काय तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Video : मोठी बातमी! पहिलीपासून हिंदीसक्ती अखेर रद्द; जनमतापुढे फडणवीस सरकार नमले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube